Breaking News

वेस्ट इंडिजने अंडर 19 वर्ल्डकप जिंकला

मीरपूर, दि. 14 -  अहमदच्या चेंडूवर एक धाव घेत पॉलने वेस्ट इंडिजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वेस्ट इंडिजने पहिल्यांदाच अंडर 19 वर्ल्डकप पटकावला. भारताचे 146 धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजने 49.3 षटकात पार केले. भारताने दिलेल्या 146 धावांच्या तुटपुंज्या लक्ष्याचा पाठलाग करताना एका टप्प्यावर वेस्ट इंडिजच्या 30 षटकात पाच बाद 80 धावा झाल्या होत्या. त्यावेळी वेस्ट इंडिजचा डाव सवयीप्रमाणे कोलमडतोय कि, काय असे वाटत होते.  
पण पॉल आणि कार्टीने सहाव्या विकेटसाठी नाबाद 69 धावांची भागादीरी रचून वेस्ट इंडिजला पहिले वहिले अंडर 19 वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवून दिले.
कार्टीने नाबाद 52 आणि पॉलने नाबाद 40 धावांची खेळी केली. लक्ष्य तुटपुंजे असूनही भारतीय गोलंदाजांनी संघर्ष केला पण कार्टी आणि पॉलने त्यांना यशस्वी होऊ दिले नाही. भारताने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची पसंती दिली जात होती. पण युवा वेस्ट इंडिज संघाने महत्वाच्या सामन्यात भारताला पराभवाचा दणका दिला. वेस्ट इंडिजचा डाव सुरु झाल्यानंतर प्रारंभीच पोपच्या रुपाने पहिला धक्का बसला. अवघ्या 3 धावांवर अवेश खानने त्याला अहमदकरवी झेलबाद केले. त्यानंतर संघाच्या 28 धावा असताना इमलाच 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार हेटमायर आणि कार्टीने तिस-या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी करुन डाव सावरला. ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच डागरने हेटमायरला 23 धावांवर अरमान जाफरकरवी झेलबाद केले.
71 धावांवर स्प्रिंजरच्या रुपाने चौथा त्यानंतर काही धावांच्या अंतराने गुलीच्या रुपाने पाचवा गडी बाद झाला.  डागरने तीन, अवेश खान आणि केके अहमदने प्रत्येकी एक गडी बाद केला. अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीमसोर भारताचा डाव अवघ्या 45.1 षटकात 145 धावात आटोपला. सरफराझ खानचा 51 अपवाद वगळता अन्य भारतीय फलंदाजांनी सपशेल निराशा केली. भारताने वेस्ट इंडिजला विजयासाठी 146 धावांचे लक्ष्य दिले आहे. लोमरॉर आणि सरफराझ खानमध्ये सहाव्या विकेटसाठी झालेली 37 धावांची भागीदारी ही भारताच्या डावातील सर्वात मोठी भागीदारी ठरली.