Breaking News

कोकणातील रस्तेविकासासाठी 20 हजार कोटी रुपये

 रत्नागिरी/प्रतिनिधी । 31 - कोकणाच्या तीनही जिल्ह्यांतून जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबरोबरच अन्य जिल्हा व राज्यस्तरावरील रस्ते विकासासाठी मिळून एकूण सुमारे 20 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचे भूमीपूजन गडकरी यांच्या हस्ते निवळी येथे झाले. या वेळी ते म्हणाले की, सुमारे दोन महिन्यात हे संपूर्ण चौपदरीकरण पूर्ण होऊन 1 मे 2018 रोजी चौपदरीकरणाचे उद्घाटन होईल असा विश्‍वास आहे. या व्यतिरिक्त रत्नागिरी-कोल्हापूर राज्य महामार्गाचे (137 किलोमीटर) चौपदरीकरण, गुहागर-चिपळूण-पाटण-कराड (71 किलोमीटर) मार्ग, निवळी-जयगड मार्ग, अलिबाग-वडखळ, इंदापूर-दिघी, पोलादपूर-महाबळेश्‍वर, नांदगाव-देवगड, कुडाळ-सिंधुदुर्ग व मालवण आणि कणकवली-आचरा या सर्व मार्गासाठी मिळून आणखी 10 हजार कोटी रूपये, अशी एकूण 20 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर कोकणच्या किनारपट्टीवरील सागरी महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेत समावेश करण्याचीही घोषणा गडकरी यांनी केली. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मालकांना घसघशीत मोबदला देण्याची मागणी केली. तो धागा पकडून गडकरी म्हणाले की, या शेतकर्‍यांना 40 लाख ते 1 कोटी रूपयांपर्यंत मोबदला देण्यात येणार असून देशातील भरपाईचा हा नवा उच्चांक आहे.जयगड येथे मेरी टाइम विद्यापीठ 
स्थापण्याचीही घोषणा गडकरी यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील पर्यटन वाढीची गरज मांडली.