Breaking News

वृक्ष लागवड आणि संवर्धन काळाची गरज : डॉ. तांबे


संगमनेर प्रतिनिधी

वृक्षतोडीचा परिणाम पृथ्वीच्या वाढत्या तापमानावर होत आहे. त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले. 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संगमनेर नगर परिषदेच्यावतीने वृक्षारोपण सप्ताह अंतर्गत शहरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ विधानपरिषद सदस्य आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार, पक्षप्रतोद विश्‍वास मुर्तडक, नगरसेवक दिलीप पुंड, किशोर पवार, गजेंद्र अभंग, नितीन अभंग, सुहासिनी गुंजाळ, प्रा. बाबा खरात, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. नगराध्यक्षा तांबे यांच्या संकल्पनेतून हरित संगमनेर शहरांतर्गत जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने दिनांक ४ जून ते ११ जून दरम्यानच्या कालावधीत शहरातील सर्व प्रभागात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नगरसेवक, नगरसेविका व नगरपरिषदेचे विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या श्रमदानातून टप्प्याटप्याने १० हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली १४ प्रभागांमध्ये कर्मचार्‍यांचे पथक नियुक्त केले आहे. या पथकाद्वारे शहरात सर्वत्र दररोज सकाळी ७ ते ९ या वेळेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे.