Breaking News

भगवंताच्या नामस्मरणाने ज्ञानप्राप्ती होते - लक्ष्मण महाराज भवार भाविनिमगाव येथील श्रीमद भागवत कथेची सांगता


भाविनिमगाव प्रतिनिधी - भगवंताच्या नामस्मरणाने ज्ञानप्राप्ती होत असल्याने ज्ञानरूपी प्रकाशाने अंधारातील वस्तूही दिसते अशा ज्ञानप्राप्तीसाठी साधू संतांचा सहवास असावा लागतो असे लक्ष्मण महाराज भवार यांनी आपल्या किर्तनात सांगितले. भाविनिमगाव येथे गेल्या 7 दिवसापासून सुरु असलेल्या श्रीमद भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. यावेळी आपल्या कीर्तनसेवेत भवार महाराज भाविकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. अधिक मासानिमित्त भाविनिमगाव येथील गुरुवर्य विठ्ठलनाथ महाराज यांच्या आनंदसाधक आश्रमात भागवत कथेचे सात दिवस दिनकर महाराज आंचवले यांनी निरुपण केले. यावेळी गुरुवर्य कृष्णदेव महाराज काळे, आळंदी धामाचे हंसानंद महाराज, मुंबई येथील शाम व यशवंत महाराज खोडे, मुकुंदकाका कुलकर्णी उपस्थित होते. येथील जगदंबा भजनी मंडळ व वारकरी सेवा संघाच्या पुढाकाराने व भाविनिमगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने या भागवत कथेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.