जिजाऊ चौक-नवीपेठ रस्त्यावरील बॅरिकेट्स काढले संबंधिताविरुद्ध कारवाईची मागणी
राहुरी तालुका प्रतिनिधी
शहरातील नगर मनमाड राज्यमार्गावरिल जिजाऊ चौकातून नवीपेठकडे जाणाऱ्या मार्गावर राहुरी नगरपरिषदेने जड वाहनास प्रवेश निषिद्ध म्हणून लोखंडी बँरिकेटस लावले होते. या रस्त्यावर जडवाहने घूसून वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून लावण्यात आलेले हे लोखंडी बँरीकेट याठिकाणी अर्धवट रस्त्याच्या एका बाजूने खोलण्यात आले आहेत. हा प्रकार अपघातास निमंत्रण देणारा ठरु शकतो. याकडे नगरपरिषदेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. अर्धवटस्थितीत काढण्यात आलेले बँरिकेट कोणी काढले, याचा शोध घेऊन संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
येथील बॅरिकेट्स काढणारा तो राव कोण, कोणाच्या सोयीसाठी हा प्रकार करण्यात आला, याची चर्चा शहरात या निमित्ताने सुरु आहे. बँरिकेट काढताना नगरपरिषदेच्या संबंधित विभागाला सूचित करण्यात आले होते का, नगरपरिषदेचा संबंधित विभाग याबाबत जागृत आहे की नाही किंवा असेल तर यावर काय कारवाई करणार, याविषयी शहरवासियांमध्ये तर्कवितर्क सुरु आहेत.