Breaking News

आशा कर्मचार्‍यांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने आयुष्यमान भारत योजनेचे केलेल्या सर्वेक्षणचे मानधन मिळण्याची मागणी

केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेचा सर्वेक्षण करणार्‍या आशा कर्मचार्‍यांना मानधन मिळण्याच्या मागणीसाठी आयटक संलग्न आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदे समोर निदर्शने करुन, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कॉ.अ‍ॅड. सुधीर टोकेकर, अध्यक्ष यमुना दौंड, उपाध्यक्षा मंगल नागरे, सुवर्णा थोरात, द्वारका राऊत, अर्चना आसने, निर्मला खोडदे, रुपाली बनसोडे, मिना कदम, रुपाली चौधरी, वैशाली वाघुले, सविता लेंडे, शारदा काळे, मनिषा कुलट आदिंसह आशा महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

केंद्र शासनाने आयुष्यमान भारत चा सर्व्हे करण्याबाबत आशा कर्मचार्‍यांना काम दिले होते. हा सर्व्हे आशा कर्मचार्‍यांनी पुर्ण केला आहे. सर्व्हे करुनही त्यांचे मानधन देण्यात आलेले नाही. तसेच गट प्रवर्तकांना आयुष्यमानचे डाटा एन्ट्रीचे काम दिलेले आहे. मात्र याचा काय मोबदला देणार याचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. आयुष्यमान भारतचा सर्व्हे करणार्‍या आशा कर्मचार्‍यांना त्यांचे ठरलेले मानधन तात्काळ द्यावे. गटप्रवर्तकांना डाटा एन्ट्रीचे मानधन ठरवून द्यावे. शौचालयाचा सर्व्हे झाला असून, त्याचे मानधन तातडीने जमा करावे. आयुष्यमान कामाच्या डाटा एन्ट्रीसाठी सॉफ्टवेअर व्यवस्थित चालत नसल्याने कालावधी वाढवून देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.