आई म्हणजे ममता,आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय.एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. मराठी भाषेतला "आई" हा शब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.आई मायेचा सागर आहे.या विषयावर अनेकांनी काव्ये आणि निबंध लिहिले आहेत. रामायणातील महानायक श्रीरामचंद्रानीही, स्वर्णमयी लंकेपेक्षाच काय, पण स्वर्गापेक्षाही आपली जन्मभूमी अयोध्या श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी जन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे. ते म्हणतात, "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी". मराठीमध्येही आई या विषयावर अनेक कविता रचलेल्या आहेत. मराठीतील प्रसिद्ध कवी यशवंत यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " ही ओळ लिहून आई या शब्दाची महानताच थोडक्यात सांगतात.स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.