Breaking News

एसबीआयला तिमाहीत 7 हजार कोटींचा तोटा

दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला आर्थिक वर्ष 2018 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत मोठे नुकसान झाले आहे. बँकेला 7,718.17 कोटींचा तोटा झाला आहे. सतत वाढणार्‍या एनपीएमुळे एसबीआयला हा तोटा झाला आहे. याउलट तिसर्‍या तिमाहीत बँकेला 2,416.36 कोटींचे नुकसान झाले होते. 2016-17 च्या तिमाहीत एकूण 2814.82 कोटी रुपयांचा नफा झाला होता. जरी या आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत बँकेचे नुकसान झाले असले तरी बँकेच्या एकूण उत्पन्नात वाढ झाली आहे. मागील वर्षी याच काळात एसबीआयचे एकूण उत्पन्न 57,720.07 कोटी होते. हा आकडा यावर्षी वाढून 68,436.06 कोटीवर गेला आहे. 
एसबीआयला झालेल्या तोट्याचे कारण बँकेने वाढवलेले प्रोव्हिजनिंग असल्याचे म्हटले जात आहे. एप्रिल-मे-जून दरम्यान बँकेच्या बुडालेल्या कर्जात वाढ होण्याची भीती आहे. त्यामुळे पूर्वानुमान लावून प्रोव्हिजनिंग वाढवण्यात आले आहे. चौथ्या तिमाहीत प्रोव्हिजनिंग 18,876 कोटी रुपये होते. हे वाढून 28,096 कोटी रुपये झाले. चौथ्या तिमाहीत एसबीआयच्या ग्रॉस एनपीएमध्ये वाढ होऊन ते 10.35 टक्क्यांवरून 10.91 टक्क्यांवर पोहोचले. याविषयी माहिती देताना वित्तीय मार्गदर्शक शरद कोहली यांनी सांगितले, की जेव्हा अशाप्रकारे सरकारी बँकेचे नुकसान होते, तेव्हा सरकारला मध्यस्थी करुन बँकेला वाचवण्यासाठी सरकारी खजिन्याचा वापर करावा लागतो. याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर पडतो. यासोबतच कोहली यांनी सांगितले, की सरकारी बँकांमध्ये कर्जबुडीच्या घटना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामागचे कारण म्हणजे कर्ज घेणार्‍याची योग्य पडताळणी न करणे किंवा लाचखोरीच्या मार्गाने कर्ज देणे. हे भ्रष्टाचाराचेच एक रूप असल्याचे कोहली यांनी सांगितले.