Breaking News

दुर्गसंवर्धन आणि स्वच्छता अभियान उत्साहात


प्रवरानगर, ‘रणझुंजार मराठा जागर’ आणि ‘शिवकार्यच लय भारी’ या शिव समुहांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले तोरणा उर्फ प्रचंड गड येथे दुर्गसंवर्धन स्वच्छता अभियान नुकतेच मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. शिवव्याख्यात्या अनिता नळे आणि शिवव्याख्याते गजानन महाराज देठे यांच्या मार्गदर्शनाखाली या तोरणा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच असा तोरणा किल्ला असून प्रचंड विस्तारामुळे या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंडगड असे नाव दिले होते. खरे तर किल्ले म्हणजे महाराष्ट्राची शान. किल्ले म्हणजे शिवरायांचे श्वास. म्हणूनच ही शान आणि महाराजांचा श्वास जपणे हे मराठ्यांचे कर्तव्य आहे. या किल्ल्यांच्या रूपाने शिवराय आजही आपल्यातच आहेत. त्यासाठीच ‘रणझुंजार मराठा जागर’ आणि ‘शिवकार्यच लय भारी’ या दोन्ही समुहाच्यावतीने दुर्गसंवर्धन आणि किल्यावरील स्वच्छता मोहिम सातत्याने राबविण्यात येतात. यावर्षी नुकतीच या समुहाने तोरणा मोहीम आखली होती. यामध्ये विठ्ठलराव घोगरे, उत्तमराव नळे, शिवभक्त शंकरराव वाबळे, सचिन वाबळे, सतीश वर्पे, दिपक गांगुर्डे, समाधान गांगुर्डे, राहुल रिकामे, कैलास जाधव, सुभाष जेधे, सोमनाथ गांगुर्डे, विनोद गांगुर्डे, किरण गांगुर्डे, भाऊराव पगार, अनिल गव्हाणे, अभिजित जाधव, राज माने, अभिजीत बळे आदी सहभागी झाले होते. नऊ वर्षांच्या मुलीपासुन ६५ वर्षांचे आजोबा या मोहिमेकडे आकर्षित झाले होते. भर उन्हात ही मोहिम असूनही उत्साहात कमी नव्हती. 

या किल्याचा थोडक्यात इतिहास असा, विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यामध्ये तोरणा किल्ला होता. शिवरायांनी तो आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहुर्तमेढ येथेच रोवली. या किल्ल्याचा ताबा घेतल्यावर त्याची दुरुस्ती करीत असतांना मोहरांनी भरलेले हंडे शिवाजी महाराजांना मिळाले. या धनाचा वापर त्यांनी तोरण्याची दुरुस्ती आणि राजगड किल्ल्याच्या उभारणीसाठी केला. पुढे हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. औरंगजेब बादशहाला तोरणा किल्ला जिंकून घ्यावा लागला. कुठल्याही भेदनितीला तोरणा बळी पडला नाही. पुढे शाहू महाराजांच्या ताब्यात व नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला.

इंग्रजांनी हा किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात दिला. असा इतिहास असलेल्या तोरणा किल्ला म्हणजे नुसती सहल नाही, किल्ला म्हणजे अखंड प्रेरणास्त्रोत आहे. हे प्रेरणास्त्रोत स्वच्छ, सुंदर व पवित्र राहावयास हवेत. त्यासाठी सर्वांनी आत्मपरीक्षणासोबतच कृतीशील होणे गरजेचे आहे. हे ‘रणझुंजार मराठा जागर’ व ‘शिवकार्यच लय भारी’ या दोन्ही समुहांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.