Breaking News

‘अमृतवाहिनी’च्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

संगमनेर प्रतिनिधी - येथील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संचलित अमृतवाहिनी एमबीएच्या ३० विद्यार्थ्यांची नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पगारावर निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. बाबा लोंढे यांनी दिली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळावे, यासाठी सहकारमहर्षि स्व. भाऊसाहेब थोरात यांनी दुरदृष्टीतून १९८३ साली अमृतवाहिनी महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाने गुणवत्तेत सातत्य राखल्याने देशात या महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला आहे. येथील शैक्षणिक वातावरण, निसर्ग सुंदर परिसर, शिस्त, स्वच्छता व होस्टेलमधील आधुनिक सुविधा त्याचबरोबर प्रगत संशोधन प्रणाली या विद्यालयाने विकसित केली आहे. विविध नामांकित कंपन्यामध्ये सातत्याने कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून अमृतवाहिनी एमबीएच्या ३० विद्यार्थ्यांची नामांकित ओप्पो मोबाईल इंडिया लि, इंडस इंडस्ट्रीज मुंबई, इन्फोसीस बीपीओ लि, कॉटरमॅट इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. श्रीराम सिटी, आसावा ट्रेडींग कंपनी, हुंदाई शिरोडे कार्स प्रा. लि, गुड इयर पुणे, सुगणा फुडस प्रा. लि, आयसीसीआय प्रुडेन्सीयल लाईफ इंशुरंन्स, एचडीएफसी एएमसी, श्रीराम फायनान्स, रिलायंन्स जिओ, अ‍ॅक्सीस बँक या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पगारावर निवड झाली.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्‍वस्त आ. डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या विश्‍वस्त शरयु देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ, एमबीएचे प्राचार्य डॉ. बाबा लोंढे आदी मान्यवरांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.