खरीप हंगामात बी-बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध- पालकमंत्री प्रा. शिंदे
पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी आज कर्जत आणि जामखेड येथे खरीप हंगाम पूर्वतयारी बैठका घेऊन प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उप महावनसंरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामनराव कदम, उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांच्यासह स्थानिक पंचायत समिती सभापती, सदस्य, पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच आदींची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले की, गेल्या दोन वर्षात झालेल्या चांगल्या पावसामुळे आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या चांगल्या अंमलबजावणीमुळे पाणीटंचाईची तीव्रता जाणवली नाही. मागील वर्षी तर एकही टॅंकर लावावा लागला नाही. त्यामुळे टंचाई परिस्थिती जाणवली नाही. कर्जत तालुक्यात खरीप क्षेत्रात 20 हजार हेक्टरहून 48 हजार 570 हेक्टरपर्यंत वाढ झाली. मका, कापूस, उडीद, मूग पीक पेरणी क्षेत्रात वाढ झाली. याशिवाय, सध्या तालुक्यात पुरेशे बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिका वाटप करण्याचे काम चांगल्या पद्धतीने झाले आहे. मात्र, कृषी सहायकांनी त्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची प्रतवारी समजावून सांगून कोणत्या प्रकारची पीके घेणे आवश्यक आहे, याचे मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे सांगून पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी त्यासाठी कृषी यंत्रणेने मोहीमच हाती घेण्याची सूचना केली.
कर्जत आणि जामखेड तालुक्यात विविध योजनांच्या संदर्भात चांगले काम झाले आहे. लक्षांकापेक्षा अधिक काम कृषी यंत्रणेने केले आहे. यावर्षीही हीच अपेक्षा प्रत्येक यंत्रणेकडून असून नागरिकांनीही शासकीय योजनांची माहिती घेऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.