Breaking News

आंबेडकर स्मारकाचे काम तीन वर्षात पूर्ण होणार

मुंबई : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाचे कार्यारंभ आदेश मे शापूरजी पालनजी कंपनी प्रा. या कंपनीला देण्यात आले आहेत. प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली असून स्मारकाचे काम तीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले. सदस्य शरद रणपिसे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. यास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, इंदू मिल येथील स्मारकासाठी मे शापूरजी पालनजी कंपनी प्रा. या कंपनीची निविदा रक्कम रुपये 709 कोटी इतकी मंजूर करण्यात आली आहे. यानुसार त्यांना 9 फेब्रुवारी 2018 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. कंपनीला तीन वर्षांत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. कामाचे महत्वाचे टप्पे दोन वर्षात आणि इतर अनुषंगिक कामांसाठी आणखी एक वर्षं देण्यात आले आहे. या कामाचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल.