Breaking News

सिंधुदुर्गात उष्णतेत वाढ, उकाड्याने नागरिक हैराण

सिंधुदुर्गनगरी, दि. 29, मार्च - मार्चअखेर उन्हाच्या झळा वाढल्याने जिल्ह्याला चांगलेच चटके सहन करावे लागत आहेत. आतापर्यंत 39 अंशापर्यंत पारा पोहोचला आहे. आतापर्यंतची स्थिती पाहता मे महिन्यात याही पेक्षा तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

उन्हाळा आला कि कडक उन्हाळ्याचे चटके फक्त महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा भागालाच सहन करावे लागतात अशी स्थिती होती. मात्र अलीकडच्या दोन तीन वर्षात या स्थितीत बराच बदल झाला असून कोकणातील सिंधुदुर्गलाही उष्णतेच्या झळा चांगल्याच पोचू लागलेल्या आहेत. या आठवड्यात काहीसे वातावरण दमट राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसे दोन दिवस वातावरणात दमटपणा निर्माण झाल्यामुळे वातावरणातल्या उकाड्यात आणखी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार 24 ला 36 अंश एवढ्या तापमानाची नोंद झाली तर 25 ते 27 या तीन दिवसात आतापर्यंतच्या सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यात हे तीन दिवस 39 अंश सेल्सियस एवढे सरासरी तापमान राहिले होते. 
मार्च अखेरीलाच 39 अंशाचा पार यापूर्वी गेला नव्हता. तोंडावर असलेल्या एप्रिल आणि त्यानंतर मे महिन्यात उष्णतेच्या आणखी झळा जिल्ह्याला सहन कराव्या लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील पाच दिवस मात्र उष्णतेचे कमाल तापमान काहीसे खाली येणार असलायचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. यात 33 ते 34 अंश सेल्सियस एवढे तापमान राहणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान गेला आठवडा या जिल्ह्यासाठी सर्वात तापदायक ठरला आहे.
जिल्ह्यात वातावरणामध्ये पुन्हा बदल जाणवू लागले आहेत. आज दिवसभर दमट वातावरण होते. आर्द्रतेचे प्रमाणही जास्त जाणवत होते. वातावरण असे वारंवार बदलू लागल्यास जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला हादरे बसणार आहेत.