Breaking News

तुकाई चारीला मंजूरी एक राजकीय मृगजळ : अँड. राणे

कर्जत ( प्रतिनिधी ) तालूक्यातील २८ गावांसाठी प्रस्तावित असलेल्या तुकाई चारीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्यासाठीची मागणी आणि लढासुद्धा अद्यापपर्यंत सुरू आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान आ. प्रा. राम शिंदे यांनी मते मिळवण्यासाठी तुकाई चारी मंजूर करून या भागाला सिंचनाखाली आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र साडेतीन वर्षांत काहीच झाले नाही. त्यामुळे हा प्रश्न एक राजकीय मृगजळ ठरत आहे, अशा आशयाचे पत्रक अँड. धनंजय राणे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. 

यात म्हटले आहे, की तुकाई चारीचा हा प्रश्न गेल्या काही दिवसांत चांगलाच पेटला आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सूर्यवंशी यांनी तुकाई चारीसाठी कर्जत तहसील कचेरीसमोर सुमारे दिड वर्षांपूर्वी धरणे आंदोलन केले होते. हा प्रश्न व आंदोलन यापुढे जास्त आक्रमक होऊन २८ गावांतील जनता मतदानाच्यारूपाने विरोधात जाऊन वेळ आल्यास निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा पराभवसुद्धा होऊ शकतो, असे भाकित अँड. राणे यांनी या पत्रकात व्यक्त केले आहे. भविष्यांत पाणी योजना करायची झाली तर प्रथम कुकडीच्या धरणांची उंची वाढवावी लागले. त्यातून अनेक कुटुंब विस्थापित होतील, त्यांना नुकसान भरपाई देवून, त्यांचे पुर्नवसन करावे लागले. अशा अनेक प्रश्नांमुळे तुकाई चारी कधीच करता येणार नाही, असे सरकारने यापूर्वी अनेकदा सांगत होते. यासंदर्भात दि. २२ मार्च, मुंबईत बैठक झाली. त्यात निर्णय झाला, तुकाई चारी मंजूर झाली म्हणून तालुक्यात सकाळी १० वाजता बातमी आली. काही कार्येकर्त्यानी तुकाई चारी मंजूर झाली म्हणून चौकाचौकात फटाके फोडून निर्णयाचे स्वागत केले. २८ गावातील लोकांच्या दबावामुळे पालकमंत्र्यांनी तुकाई चारी योजना मंजूर केल्याचा पूर्वनियोजित बहाणा केला आहे. त्यानंतर मंजूर पत्रक पाहिले असता त्यात बनवाबनवी आढळून आली. निवडणूका जवळ आल्यावर पालकमंत्री तुकाई चारी योजनेच्या भूमिपूजनाचा मोठा कार्यक्रम घेणार आणि २८ गांवातील मतदारांची भावनिक मुद्यावर मते घेणार. कदाचित निवडूनसुद्धा जातील. परंतू तुकाई चारी योजना कधीही होणार नाही, पत्रकात म्हटले आहे.