Breaking News

माझा इशारा सर्व राजकीय पक्षांना : लक्ष्मीकांत देशमुख

बडोदा/वृत्तसंस्था : राजा तु चुकत आहेस, असे सत्ताधार्‍यांना खडे बोल सुनावणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या या वक्तव्याचा इशारा सर्वच राजकीय पक्षांना आणि व्यवस्थेकडे होता, असे स्पष्टीकरण रविवारी दिले. ‘नाही रे’ या वर्गाकडे सर्वच पक्षाने लक्ष देण्याची गरज असून, आज बेरोजगारीमुळे तरुण वर्ग प्रचंड नाराज आहे. दुसरीकडे दलित आणि मुस्लिम समाजही नाराज आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी मतांचे राजकारण न करता या सर्व घटकांकडे लक्ष देण्याचे गरज आहे, असे स्पष्टीकरण यावेळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिले.


देशातील उन्मादी धार्मिक वातावरणाचा निषेध म्हणून पुरस्कार वापसीचा मार्ग काही लेखकांनी स्वीकारला. त्यामागील त्यांची भूमिका शासनाने मोठ्या मनाने समजून घ्यायला हवी होती. आधुनिक-सुसंस्कृत जगात शासन हे कलावंतापुढे नम्र असते, असायला हवे. भारतात ही सुसंस्कृतता आज दिसत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. तुम्ही या अर्थाने लोकशाहीचे तत्त्व पाळत नाही आहात. म्हणून मी असे म्हणण्याचे धाडस करतो की राजा तू चुकत आहे! तू सुधारले पाहिजे. असे लक्ष्मीकांत देशमुख हे आपल्या भाषणात म्हणाले होते. राष्ट्रवादाच्या नावाखाली काही जणांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जात आहे. काहींच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेतली जात आहे. गांधीजींच्या वचनांचा आधार देत ते म्हणतात, देशभक्ती व राष्ट्रवाद आणि माणसुकी-मानवता वेगवेगळ्या नाहीत. म्हणून राष्ट्रवादी हा सर्वसमावेशक असतो. तो कुणा गट, पक्ष, वंशाला वगळत नाही. आज याविरुद्ध घडताना दिसत आहे. म्हणून माझी चिंता मी या मंचावरुन व्यक्त करीत आहे. समझनेवालों को इशारा काफी है’ असं लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले होते.