Breaking News

त्रिपुरात माकप-भाजपमध्ये थेट लढत विधानसभेच्या 60 पैकी 59 जागांसाठी मतदान

आगरतळा/वृत्तसंस्था : त्रिपुरा विधानसभेच्या 60 पैकी 59 जागांसाठी रविवारी मतदान संपन्न झाले असून, येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भाजपा या पक्षात थेट लढत आहे. गेली अडीच दशके ईशान्येकडील या राज्यात माकपची सत्ता आहे. माकपला त्यांचा हा बालेकिल्ला राखण्यासाठी भाजपशी संघर्ष करावा लागणार आहे.


‘चलो पलटे’ म्हणजेच बदल करा अशी घोषणा देत भाजपही निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरली आहे. 3 मार्चला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे त्रिपुरामध्ये नेमकी कोण बाजी मारणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक मतदान केंद्रावर भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. त्रिपुरामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 31चा आकडा पार करणं गरजेचं आहे. यावेळी सीपीएम आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. भाजप इथे 50 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर इतर 9 जागी त्यांनी आपल्या मित्र पक्षांसाठी सोडल्या आहेत. तर काँग्रेस 58 आणि सीपीएम 56 जागा लढवत आहे.
यावेळी तब्बल 292 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्रिपुरामध्ये एकूण 25 लाख मतदार आहेत. 2013 साली येथील विधानसभा निवडणुकीत सीपीएमने 49 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. तर काँग्रेसला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले होते. माणिक सरकार हे मागील चार टर्मपासून त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत.