Breaking News

महाराष्ट्राला सिंचन व्यवस्थापनासाठीचा प्रथम पुरस्कार


देशात सर्वात जास्त पाणी वापर संस्था स्थापन करुन विक्रमी सिंचन व्यवस्था निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला केंद्र शासनाच्या केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळाच्यावतीने उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापनाचा प्रथम पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री डॉ.सत्यपाल सिंग यांच्या हस्ते राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जलसंपदा विभागाचे सचिव च.आ. बिराजदार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
केंद्र शासनाचा हा पुरस्कार प्रथमच महाराष्ट्राला मिळाला आहे. येथील स्कोप कॉम्प्लेक्सच्या सभागृहात केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री डॉ.सत्यपाल सिंग यांच्या हस्ते सिंचन व ऊर्जा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे राज्य व संस्थांचा विविध श्रेणीत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाचे सचिव यु.पी. सिंह,केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पुष्पेंद्र सिंह, केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळाचे अध्यक्ष रविंद्र वर्मा मंचावर उपस्थित होते.