Breaking News

व्यवस्थापन सार्थ करायचे असेल तर समाज जीवनाची जोड महत्वाची - अरुण करमरकर

डोंबिवली, दि. 12, जानेवारी - जाती-जमातीमध्ये युद्ध सुरु झाले आहे. जो काही विकासाचा वाटा आहे तो जास्तीत जास्त माझ्याकडे, मी ओरबाडून घेईन अशा प्रकारची स्पर्धा सुरु झाली आहे. ज्या-ज्या आधारावर भेद उत्पन्न करता येतील ते भेद उत्पन्न करून माझा मतांची बँक मी कशी सुरक्षित ठेवीन अशा प्रकारची राजकरणामध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. परंतु केवळ राजकीय सत्तेच्या माध्यमातून समाज जीवनाची उभारणी होत नसते. केवळ कायद्याच्या माध्यमातून सुव्यवस्था उत्पन्न होत नसते. वारंवार अनुभव घेवून सुद्धा मग त्याला आणखी कशाची जोड द्यावी याकडे वळायच सतत नाकारातच आलो. व्यवस्थापन सार्थ करायचे असेल तर समाज जीवनाची जोड द्यावी लागते असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी केले.


राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत विजिगिषु समाजाच्या दिशेने वाटचाल या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा सुलभा डोंगरे, कार्यवाह संजय कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले, विजिगिषु समाजाकडे वाटचाल करण्याची आवश्यकता आहे ती कशासाठी हे लक्षात घेतले पाहिजे. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळासाहेब बाठे म्हणाले की , जो पर्यत हिंदुंना मुल होतात तोपर्यंत संघाला काम करायचे आहे. काळाची पावलेही पुढे-पुढे जात असतात, त्यानुसार परिस्थितीची आव्हाने, इतर पैलू बदलत जात असतात. सर्व समाजाच्या दर्शनावरून एक गोष्ट ठळक पणे लक्षात येते ती म्हणजे गुलामगीरीने पिकलेला आणि गलीतगात्र असा समाज आहे. अंधश्रद्धामध्ये जखडला गेला आहे. तरीही नितीमुल्याचा आदर जो जोपासला आहे तो आजही तसाच आहे. समाजाची ताकद अध्यात्मिकाच आहे. 
प्रत्यक्ष विजयाची चव चाखलेला समाज होता याची खुणगाठ अनेकांनी आपल्या चिंतनामधून व्यक्त केली आहे. 
स्वामी विवेकानंदानाही म्हणावे लागले की, भविष्यामध्ये रुची बाळगत नाही, भविष्य सांगत नाही, परंतु माझ्या अंत:चक्षुसमोर मला भारतमाता पुन्हा एकदा विश्‍वगुरुपदी विराजमान झालेली दिसते. 70 वर्षांपूर्वीची आणि त्या आधीची हजार-बाराशे वर्ष आपल्या समाजाच्या सगळ्याच शक्तींना आक्रमकांची झुंज करावी लागली आहे. त्यामुळे समाजामधल्या शक्त ीला अद्ययावत स्वरूपामध्ये पुन्हा-पुन्हा तेजस्वी करण्याच्या प्रक्रियेमध्ये खंड पडला आहे. कोणत्याही गोष्टीच सातत्य टिकवायचं असेल तर परिश्रमांची गरज असेत.

सद्य स्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले कि, सामान्यपणे प्रसारमाध्यमे जे विकृत आहे तेच दाखवितात, वर्तमानपत्राचं पाहिले पान कायम विकृत घटनांनी, अत्याचाराच्या, बलात्काराच्या, भ्रष्टाचाराच्या, विकृतीच्या अशा बातम्यांनी भरलेल्या असतात. जणू काही जगात काही चांगलं काही चाललेलच नाही, काही प्रमाणात हे जरी खरे असले तरी या सगळ्या प्रवाहामध्ये आपल्याला अनेक वेळा आपल्याला अभिमानाने मान उंचविणारे कार्य झालेले पहायलाही मिळाले आहे. ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान आणि न्याय संस्थासुद्धा या सगळ्या पातळीवरती भारतीय माणसांनी पराक्रम गाजविला आहे.