गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यासाठी ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ : प्रा. दरेकर
शेती व्यवसाय करताना होणारे अपघात , वीज पडणे, पूर, सर्प दंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे, इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात , रस्ते अपघात, वाहन अपघात, रेल्वे अपघात आणि अन्य कोणत्याही कारणामुळे होणाऱ्या अपघातात शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडते. म्हणून सन २००५-०६ पासून महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली. अपघातात मृत झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाला एक लाख रुपये विमा दिला जाऊ लागला.
अपघातात मृत्यू पावलेल्या , दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झालेल्या , एक डोळा आणि एक अवयव निकामी झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाला दोन लाख रुपये आणि एक डोळा किंवा एक अवयव निकामी झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाला एक लाख रुपये विमा कंपनीकडून देण्याची व्यवस्था राज्य शासनामार्फत केली जाते.त्यासाठी महाराष्ट्र शासनाने १ कोटी ३६ लाख ९८ हजार ९६५ शेतक-यांचा एक वर्षाचा विमा हप्ता ४३ कोटी ४९ लाख ४२ हजार १३९ रुपये दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. ला आदा केलेला आहे. गेल्या वर्षी हा हप्ता ३१ कोटी ४ लाख रुपये होता. व कंपनी दि ओरिएटल इन्शुरन्स कंपनी लि. हीच होती.
महाराष्ट्रातील १० ते ७५ वर्षे वयाचा जो शेतकरी खातेदार असेल म्हणजे ज्याच्या नावावर ७/१२ असेल तो या योजनेसाठी पात्र असतो. कुटुंबातील शेती यासाठी विचारात घेतली जात नाही. शासनाने भरलेला विमा हप्ता आणि वर्षभरात अपघाती शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई याचा ताळमेळ कृषी खात्याने घालावा. कारण काही तरी त्रुटी काढून ही कंपनी शेतकऱ्यांना विमा देण्याचे टाळते. मे २०१६ मध्ये दाखल झालेल्या विम्याचे दावे या कंपनीने गेल्या ७ महिन्यात दिलेले नाहीत.
