Breaking News

कांद्याची तेजी यंदाही कायम ; बळीराजा समाधानी


राहुरी प्रतिनिधी - यंदाच्या वर्षात अॉगस्टनंतर कांद्याच्या बाजारभावात आलेली तेजी वर्ष संपत आल्यानंतरही कायम राहिली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधे समाधान व्यक्त केले जात आहे. जून जुलै महीन्यात गावरान कांद्याला साधारणपणे सातशे ते हजारच्या आसपास भाव मिळाला होता. साठवणूक करुन ठेवलेला चाळीतील कांदा भाव वधारल्याने सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात कांद्याचा भाव तिशी पार करत पन्नासीपर्यंत पोहचला होता. 
गेल्या दोन वर्षातील हा उच्चांकी दर होता. ज्या शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठून ठेवला, त्यांना याचा लाभ मिळाला. तर काहींंनी जून जुलै महीन्यातच भाव वाढतील कि नाही, या शंकेमुळे कांदा विक्रीस पाठवून मिळेल तो दर पदरात पाडून घेतला. गावरान कांदा नोव्हेंबर अखेरपर्यंत बाजारात दाखल होत होता. गावरान कांद्याची आवक घटल्याने यानंतर आलेल्या नव्या कांद्यालाही बाजार तेजीत असल्याने उच्चांकी वीस ते तीस रुपये दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी यंदा समाधानी आहेत. तेजी अशीच कायम राहिली तर फेब्रुवारी अखेरपर्यंत कांदा बाजारभाव टिकून राहतील, अशी शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.