Breaking News

पेंचच्या कालव्यात बुडून चौघांचा मृत्यू

नागपूर, दि. 22, डिसेंबर - सहलीसाठी गेलेल्या चौघाचा नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातल्या पेंच धरणाच्या कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी 5.40 वाजता घडली. मोटरसायकल घसरून कालव्यात पडल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामटेक नजीकच्या मनसर येथील बोंदरे-ले-आऊट येथे राहणारे जैन कुटुंबिय मोटरसायकलने फिरायला गेले होते. 

बाईक रायडिंगचा आनंद घेण्यासाठी जैन कुटुंबातील कमलेश, प्रियंका, अंजली, आशिष आणि पायल हे दोन मोटरसायकल्सने सहलीसाठी गेले होते. हिवाळ्याच्या दिवसात लवकर अंधार पडत असल्यामुळे त्यांनी 5 वाजेच्या सुमाराला घर परतण्याचा निर्णय घेतला. मनसरला परत येत असताना पारशिवनी तालुक्यातील गुरी पांडे शिवारात संध्याकाळी 5.40 वाजेच्या सुमाराला कमलेशची मोटरसायकल घसरून कालव्यात पडली. 

त्यामुळे मोटरसायकल चालवणारा कमलेश शांतीलाल जैन आणि त्याची पत्नी अंजली जैन हे दोघे कालव्यात बुडाले. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात आशिष व प्रियंका जैन यांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेत फक्त पायल जैन सुरक्षित राहिली. या दुर्घटनेची सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान अंधार पडल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत असून आतापर्यंत दोन मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत.