शेतकर्यांच्या प्रश्नावर उपाय शोधला पाहिजे. केवळ जाहिरातबाजी करू नये - उध्दव ठाकरे
गेले काही दिवस सर्वच वृत्तपत्रातून मी लाभार्थी म्हणून मोठ्या जाहिराती राज्य सरकारच्यावतीने केल्या जात आहेत. तसेच कर्जमाफीचा डांगोराही पिटला जात आहे. ही कर्जमाफी क रताना ज्या ऑनलाईन पध्दतीचा वापर केला गेला आहे, त्यात मोठा गफला झाला असल्याचा संशय व्यक्त करून उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वार करताना सांगलीत झालेल्या पोलिस स्थानकातील संशयित आरोपीच्या खुनासंदर्भात या सरकारला व गृह खाते सांभाळणार्यांना लाज कशी वाटली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला.
राज्यातील सर्वच विभागात शेतकर्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. त्यावर ठोस उपाय शोधला पाहिजे. केवळ जाहिरातबाजी करू नये, असे सांगत केवळ जाहिरातीमध्ये अच्छे दिनचे स्वप्न दाखविणार्या सरकारने शेतकर्यांच्या कर्जमुक्तीसाठी ठोस उपाययोजना आखली पाहिजे. कर्जमुक्तीसाठी शेतकर्यांनी किती हेलपाटे मारायचे ? शेतकरी असल्याचा दाखला दाखवायचा ? आता सरकार लायक आहे की नालायक आहे ? याचा दाखला शेतकरीच मागतील. शेतकर्यांना छळू नका, शेतकर्यांना छळणारे हे राज्याचे दुश्मनच आहेत. शेतकरी ऑनलाईनप्रमाणेच सौभाग्य योजनाही फसवी निघाली आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
मित्रपक्षावर वार हा शरद पवारांचाच
सत्तेत राहून मित्रपक्षावर टीका करणारे पाहिले नाहीत, असे म्हणणार्या शरद पवार यांनी काँग्रेसच्या सत्तेच्या काळात मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत वार करून तत्कालीन जनता पक्षाशी युती करीत मुख्यमंत्रीपद मिळविले होते. तसेच श्रीमती सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा पुढे करून स्वतंत्र पक्ष स्थापन करून पुन्हा काँग्रेसशी लाळघोटेपणा केला होता. अशा शरद पवार यांनी शिवसेनेला मित्रपक्षावर टीका करू नये, असा सल्ला देण्याचा नैतिक अधिकार दोन दशकापूर्वीच गमावला आहे. सतत पाठीवर वार करणारे शरद पवार हे समोरासमोर टीका करणार्या शिवसेनेला सल्ला देण्याच्या फंदात पडू नयेत, असा टोलाही उध्दव ठाकरे यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांचे गुरू- शिष्याचे नाते आहे.
सत्तेत राहून मित्रपक्षावर टीका करणारे बघितले नाहीत, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. मात्र भाजप व शिवसेना हे दोन्हीही पक्ष वेगवेगळे आहेत. परंतु एकाच पक्षात असताना शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता, अशा एकमेवद्वितीया शरद पवार यांनी शिवसेनेला सल्ले देऊ नयेत. सत्तेसाठी काँग्रेससमवेत भांडी घासणार्या शरद पवार यांनी आमच्या भानगडीत पडू नये. देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच घेतलेल्या शरद पवार यांच्या भेटीत शेतकर्यांऐवजी केवळ क्रिकेटशीच चर्चा केली असे सांगतात. याला काय म्हणावे ? आम्ही सत्तेतून बाहेर पडलो, की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपशी एकोपा करायला केव्हाही तयार आहे, असेच चित्र सध्या निर्माण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.