Breaking News

ग्राहकांनी पोस्टात भरलेल्या विम्याचे 52 लाख लंपास

सोलापूर, दि. 16, नोव्हेंबर - शहरातील मुख्य टपाल कार्यालयात विम्याचे हप्ते भरता सुमारे 52 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी लिपीक अमजद मुबारक शेख याच्यावर येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहायक डाक अधीक्षक सोमनाथ पांडुरंग काळे यांनी फिर्याद दिली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शेख गायब आहे.

लिपीक शेख हा पंढरपूर हे येथील टपाल कार्यालयात 19 मे 2015 ते 20 सप्टेंबर 2017 या काळात कार्यरत होता. त्याने जीवन विम्याचे हप्ते ग्राहकांकडून घेतले. मात्र ते पोस्टात जमा केले नाहीत. खातेअंतर्गत चौकशीत 51 लाख 72 हजार 140 रुपयांचा अपहार झाल्याचे आढळले. त्यानंतर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक धोत्रे तपास करत आहेत.
शेख हा 2015 मध्ये अकलूज येथील टपाल कार्यालयातून पंढरपूरला बदलून आला. ग्राहकांनी दिलेल्या विम्याच्या हप्त्याचे पैसे प्रत्यक्ष कार्यालयात जमा करताना कमी रकमेचा भरणा करायचा. दिवसभराच्या भरण्यात सुरुवातीला 100 रुपयांपासून कमी भरणा करण्यास त्याने सुरुवात केली.
प्रत्यक्षात सप्टेंबर 2017 मध्ये हा प्रकार येथील कार्यालयातील वरिष्ठांच्या लक्षात आला. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून चौकशीची चक्रे फिरली. चौकशीअंती 51 लाख 72 हजार 140 रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर शेख याने सुमारे 21 लाख 30 हजार रुपये टपाल कार्यालयात जमा केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र त्यानंतर पैसे भरणे शक्य झाल्यामुळे तो गायब झाला.
ग्राहकांनी विम्याचे पैसे जमा केल्यानंतर शेख याने तेवढ्या रकमेच्या ग्राहकांना पावत्या दिलेल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात तो कार्यालयामध्ये कमी रकमेचा भरणा करायचा. त्यामुळे यात ग्राहकांची फसवणूक झाली नसेल असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. मात्र त्याने टपाल कार्यालयाची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आल्याचे सांगण्यात आले.