Breaking News

राज्य मंत्रीमंडळ विस्तारात अकार्यक्षम मंत्र्यांना मिळणार नारळ ?

मुंबई, दि. 28, ऑक्टोबर - राज्य मंत्री मंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता असून, यामध्ये काही अकार्यक्षम मंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याचे संकेत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 
येत्या 31 ऑक्टोबरला सरकारला तीन वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. मंत्रिमंडळ विस्तारात स्वाभिमानी  महाराष्ट्र पक्षाची स्थापन करुन राष्ट्रीय लोकशाही आघाडी मध्ये दाखल झालेल्या नारायण राणे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात अकार्यक्षम आणि  भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे.
गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एमपीमिल कंपाऊंडचा एफएसआय खासगी बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप आहे. तर एआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैकी 60 टक्के  भूखंड वगळल्याचा आरोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर आहे. या दोघांनीही मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची तयारी दाखवली, मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांची पाठराखण के ली होती. याशिवाय आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनीही छाप उमटवणारं काम केलेलं नाही. पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. एप्रिल 2016 पासून  तब्बल 600 आदिवासी मुलं दगावली. देशभर राज्याची बेअब्रू झाली. त्यामुळे सावरांच्या कारभारावर मुख्यमंत्री नाखुश आहेत.