दोन चारचाकी वाहनांच्या अपघातात मुंबईचे दोन ठार ,सहा जखमी
औरंगाबाद, दि. 23, ऑक्टोबर - दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन 2 जण जागीच ठार झाले. सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी नाशिक रोडवरील वरझडी फाट्याजवळ घडली. जखमींना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किशोर बुंदेलवार चंद्रपूरहुन मुंबईकडे त्यांच्या (एम. एच. 2 इपी 4241) या चारचाकीने पत्नी अमृता व चालक अबू आबेद यांच्या सोबत जात होते. दुसर्या चारचाकीमध्ये (क्र. एम. एच. 15 - बीवाय 489) सागर तुरे हे परिवारासह येवल्याहून औरंगाबादला घरी येत होते. औरंगाबाद - नाशिक रोडवरील वरझडी फाट्यावर आज सकाळी दोन्ही चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता, की दोन्ही वाहनांच्या बॉनेटचा अक्षरश. चुराडा झाला. किशोर यांच्या वाहनात मागे बसलेली त्यांची पत्नी अमृता किशोर बुंदेलवार (वय 32 रा. जोगेश्वरी पश्चिम, मुंबई) व चालक अबू आबेद हे जागीच मरण पावले. किशोर अशोक बुंदेलवार 40(रा. जोगेश्वरी ,मुंबई), वसंत बाळा तुरे 58, इंदूबाई बाळा तुरे 50, शोभा वसंत तुरे 52, सुमानबाई शिरसाठ 45, सारंग वसंत तुरे 33 (सर्व राहणार मयुरपार्क, जाधववाडी) अशी दोन्ही चारचाकीतील जखमींची नावे आहेत. दुसर्या वाहनातील तुरे परिवारातील पाच जण गंभीर जखमी अवस्थेत गाडीत अडकले होते. परिसरातील काही नागरिकांनी तात्काळ ही माहिती फोनवरून पोलिसांना दिली शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक खोपडे, हवालदार अप्पासाहेब काळे, राजधार पठाडे, एम. बी. लहाने यांनी घटनास्थळी धाव घेऊतेथे डॉक्टरांनी अमृता वअबू आबेद यांना मृत घोषित केले. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.