Breaking News

सत्यजित तांबे यांची मनपा प्रशासनास प्रश्‍नांची सरबत्ती

। मनपातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर,ठेकेदाराची उडवाउडवीची उत्तरे

अहमदनगर, दि. 19, ऑक्टोबर - मुकुंदनगर भागातील अंतर्गत रस्त्यांची खोदाई तसेच मूलभूत सुविधा अभावी येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे मागील आठवड्यात येथील नागरिकांसमवेत युवक काँग्रेसच्या वतीने मनपावर मोर्चा काढून उपायुक्त राजेंद्र चव्हाण यांना घेराव घालण्यात आला होता व मुकुंदनगर भागातील सद्यस्थिती पाहण्यास भाग पाडले होते. यावर उपायुक्त चव्हाण यांनी संबंधित भागाची पाहणी करून युवक काँग्रेस पदाधिकारी व येथील नागरिकांना येत्या मंगळवारी (दि.17 ऑक्टोबर) आयुक्तां समवेत संबंधित विभागातील अधिकारी, ठेकेदार व आपले प्रतिनिधी यांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले होते.
मंगळवारी मनपा आयुक्त घनशाम मंगळे, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीमध्ये आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. यावेळी मनपा उपायुक्त राजेंद्र चव्हाण, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, अल्पसंख्याकांचे प्रदेश उपाध्यक्ष मुन्ना चमडेवाले, बाळासाहेब भुजबळ, युवक अध्यक्ष गौरव ढोणे, सरचिटणीस अज्जूभाई शेख आदींसह मुकुंदनगर भागातील मोहम्मद साहब, महेबूब शेख, मोहसीन शेख, खालिद शेख, असद शेख आदी नागरिक यावेळी बैठकीस उपस्थित होते. यावेळी मुकुंदनगर भागातील नागरिकांचे प्रतिनिधित्व युवानेते सत्यजीत तांबे यांनी केले.
मुकुंदनगर भागातील संजोग नगर ,विखे पाटील शाळा ते संभा टपरी, आयेशा मस्जिद पर्यंतच्या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून सुरु आहे, रस्ते दुरुस्थीच्या नावाखाली खोदून ठेवले आहे. वारंवार येथील नागरिकांनी ठेकेदार व प्रशासनाकडे तक्रार करून देखील काम अत्यंत संथ गतीने होत असून नुकतेच काही नागरिकांना अपघातास सामोरे जावे लागले असून मनपाचे याकडे लक्षच नसल्याचे यावेळी सत्यजीत तांबे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
सदर कामाचे टेंडर हे 2015-2016 मध्ये निघालेले असतांना हे काम अद्याप पर्यंत पूर्ण झालेच का नाही ? प्रशासनाच्या वतीने कामाच्या देखरेखी साठी पीएमसी समितीची स्थापना केलेली असतांना देखील काम अपूर्ण का आहे? संबंधित ठेकेदार कामात कसूर करत आहे, शिवाय आत्तापर्यंत त्यांना दोनदा नोटिसा बजावल्या याचे साधे उत्तर देखील ठेकेदारानी न दिल्याने व यावर कुठलीच कारवाई केली नसल्याने पालिकेतील भोंगळ कारभाराचे नागरिकांना दर्शन होत आहे?पिएमसी ने यावर कुठली कारवाई केली? ठेकेदार हि उडवा उडवीचे उत्तर देत असतांना ठेकेदार काम करीत नसेल तर ठेकेदार बदलण्याची देखील तसदी पालिकेने घेतलेली नाही या सारखे दुर्दैव नसावे.अशा अनेक प्रश्‍नांचा पाढाच श्री तांबे यांनी आयुक्तांपुढे मांडला.  सदर रस्त्याचे काम कशाप्रकारे पूर्णत्वास घेऊन जाणार व कधी पर्यंत पूर्ण करून येथील नागरिकांचा त्रास कमी करण्या बरोबरच येथील मूलभूत सोयीसुविधा पूर्व पदावर आणण्यास कोणती पाऊले प्रशासन उचलणार ? यावर आयुक्त व प्रशासन अनुत्तरित असल्याने श्री तांबे यांनी प्रशासनास येत्या 30 ऑक्टोबर चा अल्टिमेटमच दिला आहे.