Breaking News

बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची घोडदौड

बीड, १० ऑक्टोबर - बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत लढतीत मतमोजणीअंती जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत दिसत असून त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. परळी तालुक्यातील काही मोक्याच्या पांगरी म्हणजे गोपीनाथ गड सारख्या प्रतिष्ठेच्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे धनंजय मुंडे यांच्या गटाने बाजी मारली असाहे. अन्यत्र पंकजा मुंडे समर्थकांनी मोठा विजय मिळवला आहे. परळी तालुक्यातील पांगरी (गोपीनाथ गड ) ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे. सरपंचपदासह 11 पैकी 10 जागावर धनंजय मुंडेंच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने तेथे विजय मिळवला आहे. दरम्यान, इंजेगाव या ग्रामपंचायत ही धनजंय मुंडे आणि प्ंकजा मुंडे प्रतिष्ठेची केली होती, यामध्ये पंकजा मुंडे यांच्या पॅनलने 10 पैकी 10 जागा जिंकत धनजंय मुडे पॅनलचा पराभव केला आहे. गोपीनाथ मुंडे यांचे मूळ गाव नाथरामधील नऊपैकी राष्ट्रवादीचे सरपंचपदासह पाच सदस्य तर भाजपचेही चार सदस्य बिनविरोध निवडले गेले. एकंदर ग्रामपंचायत पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या ताब्यात गेली आहे. या ग्रामपंचायतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. 
परळी तालुक्यात पंकजा मुंडे यांची सरशी
नाथ्रा व पांगरी गावात धनंजय मुंडे यांनी वर्चस्व मिळवले असले तरी संपूर्ण परळी तालुक्यात पंकजा मुंडे यांनी मोठे वर्चस्व मिळवले आहे. भाजपने परळी तालुक्यातील 54 पैकी तब्बल 42 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला आहे. आणखी वीस ग्रामपंचायतीचे निकाल येणे बाकी आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर संपूर्ण परळी तालुक्यात मात केली आहे. प्रतिष्ठेच्या बनलेल्या इंजेगाव, डाबी यासह अस्वलांबा, बेलंबा, पिंपळगाव गाढे, कौडगाव साबळा,कासारवाडी, रामेवाडी, नागदरा, खोडवा सावरगाव, पाडोळी हसनाबाद, वाका, तडोळी, कन्हेरवाडी, जिरेवाडी, हाळम, तर मतदारसंघातील धानोरा ता. अंबाजोगाई धसवाडी, कातकरवाडी, वाघाळा, पिंपरी तडोळा या ग्रामपंचायतींवर पंकजांच्या समर्थकांनी झेंडा फडकवला आहे. परळी तालुक्यातील भाजपकडे बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये देशमुख टाकळी, मैंदवाडी, टोकवाडी हेळंब, गुट्टेवाडी, कुसळवाडी यांचा समावेश आहे.
माजलगाव तालुक्यात आतापर्यंतच्या निकालानंतर बहुतांश ग्रामपंचायतीवर माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचे वर्चस्व कायम राहिले असुन मतदारांनी भाजपचे आमदार आर. टी. देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून मोहन जगताप यांनी स्थापन केलेल्या जनविकास आघाडीलाही कौल मिळाला आहे. तालुक्यातील सादोळा, खरात आडगांव, नाकले पिंपळगांव, नागडगांव, गोविंदपुर, वाघोरा या ग्रामपंचायती राष्ट्वादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या तर शृंगारवाडी, एकदरा, धनगरवाडी, शहाजानपुर या चार ग्रामपंचायती छत्रपती कारखाना उपाध्यक्ष मोहन जगताप यांच्या ताब्यात तर आमदार देशमुख यांच्या ताब्यात पुनंदगांव, रेणापुरी, सुरूमगांव, रोषणपुरी, शुक्लतिर्थ लिमगांव, राजेवाडी, ब्रम्हगांव, गोविंदवाडी, देवखेडा, डेपेगांव, लहामेवाडी, मनुरवाडी या ग्रामपंचायत आल्या आहेत. दरम्यान तालुक्यात मतदारांनी माजी मंत्री प्रकाश सोळंके यांना मतदारांनी कौल दिला असला तरी विद्यमान आमदार आर. टी. देशमुख, मोहन जगताप यांनी अनेक गावात आपले खाते उघडले आहे.
जयदत्त क्षीरसागर यांचा गावात पराभव
बीडमधील नवगण राजुरी येथील प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार जयदत्त क्षीरसागर यांना पुतणे संदीप क्षीरसागर यांनी धोबीपछाड दिला. संदीप क्षीरसागर यांच्या गटाने सरपंचपदासोबत सदस्य संख्येतही बाजी मारुन दणदणीत विजय संपादन केला. दीक्षा ससाणे यांनी सातपुते यांना पराभवाची धुळ चारली. शिवाय सदस्यांमध्येही संदीप गटानेच मुसंडी मारली. जि.प. पाठोपाठ ग्रा.पं. निवडणुकीतही पुतणे संदीप काकांना भारी ठरले आहेत.