Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष नंबर वन

मुंबई, १० ऑक्टोबर -राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घसघशीत यश मिळविले असून भाजप नंबर वन ठरला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला कौल दिल्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी गावकऱ्यांचे आभार मानले व भाजप कार्यकर्त्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले.
रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांप्रमाणे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही भाजपच नंबर वन ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या कामगिरीवर राज्यातील ग्रामीण जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. भाजप सरकारच्या विरोधात ग्रामीण भागात वातावरण तापवू पाहणाऱ्या विरोधी पक्षांना मतदारांनी खणखणीत उत्तर दिले आहे. सरपंचांची थेट निवड पहिल्यांदाच होत असून या बदलाला ग्रामीण जनतेने उत्साही प्रतिसाद दिला आहे.