Breaking News

रत्नागिरी पोलिसांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली दिवाळी

रत्नागिरी, दि. 22, ऑक्टोबर - रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी आणि त्यातही भाऊबीजेचा सण साजरा केला. स्त्रियांना  स्त्रीधन परत करून तसेच भावांना हेल्मेट देऊन सुरक्षित वाहतुकीचा संदेश हा सण पोलिसांनी साजरा केला.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबवत असतात. दीपावलीच्या  मंगल व पवित्र वातावरणात पोलिसांनी भाऊबीजेची अनोखी भेट सर्वांना दिली. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांची उकल झाल्यानंतर परत  मिळालेल्या मुद्देमालात स्त्रीधनाचा समावेश असतो. त्याची पैशात किंमत होऊ शकत नाही. कारण त्यामध्ये महिलांच्या आठवणी व भावना गुंतलेल्या  असतात. त्यामुळे भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला हे स्त्रीधन न्यायालयाच्या परवानगीने महिला फिर्यादी भगिनींना पोलिसांनी परत केले. त्यामुळे संबंधित महिलाच्या  चेहर्‍यावर उमटलेला आनंद पोलिसांना समाधान मिळवून देऊन गेला.
जिल्हा पोलिसांनी हेल्मेटची भेट देण्याचा आणखी एक उपक्रम राबविला. रस्त्यांवरील अपघात व त्यातील तरुणांचा अकाली मृत्यू संवेदनशील मनाला  अस्वस्थ करतो. अपघातातील मृतांची संख्या कमी करण्यासाठी हेल्मेटच्या वापराबाबत न्यायालयही आग्रही आहे. मात्र अद्याप वाहनचालकांना हे बंधन  जाचक वाटते. आपली सुरक्षितता आपल्या हाती आहे, याचा दुचाकीचालकांना नकळत विसर पडतो. म्हणूनच महिला पोलिसांनी भाऊबीज साजरी करताना  आपल्या भाऊरायांना हेल्मेटची भेट देऊन वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे वचन त्यांच्याकडून घेतले. त्यानिमित्ताने रत्नागिरी शहरातून काढलेल्या  प्रबोधन फेरीत जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक आणि अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारीही सहभागी झाले होते.  एसटी कर्मचार्‍यांच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जबाबदारी ओळखून प्रसंगी रजासुद्धा रद्द करून कर्तव्यावर रुजू झाले होते. या  सर्वांच्या समवेत प्रभारी अधिकार्‍यांनी पोलीस ठाण्यांमध्ये दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित केला.