Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेनेत रस्सीखेच

रत्नागिरी, दि. 04, ऑक्टोबर - ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागावर वर्चस्व राखण्यासाठी सर्वच मोठ्या पक्षांची धडपड सध्या सुरू आहे. स्थानिक  आघाड्यांच्या माध्यमातून पक्षीय वर्चस्वाचा डंकाही पिटला जाणार आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची ताकद पणाला लावली  असून प्रत्येकाने जास्तीत जास्त ग्रामपंचायती जिंकण्याचा दावा केला आहे. भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय स्तरावरचे दोन्ही पक्ष बरेचसे पिछाडीवर आहेत.  निवडणुकीतील माघारीची मुदत येत्या 6 ऑक्टोबर रोजी संपत असून त्यानंतर चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.
गेल्या दोन वर्षांत केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या अनेक निर्णयांबद्दलची नाराजी ग्रामीण भागातील लोकांमध्ये विशेषत: शेतकर्‍यांमध्ये दिसत आहे. वाढती महागाई,  इंधनाचे वाढलेले दर, शेतकर्‍यांच्या कर्जमाफी योजनेचा गोंधळही या नाराजीत भर टाकत आहे. शेतकरी व ग्रामीण जनतेतून सरकारबद्दलची नाराजी स्पष्टपणे जाणवत  आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी सेना व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात सरसावली आहे.
अनेक ठिकाणी गावाच्या विकासाचा मुद्दा पुढे करून तडजोडीचा प्रस्ताव येतो. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस बिनविरोध निवडणुकीसाठी तयार असल्याचे राष्ट्रवादी  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी सांगितले. ते म्हणाले की, लोकांच्या प्रश्‍नांशी एकरूप होऊन ते सोडविण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या आमचा पक्ष  करणार आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आम्ही ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी समन्वय राखून काम करीत आहोत. ग्रामपंचायत निवडणुकीत चांगला व सक्षम  उमेदवार निवडताना तेथील कार्यकर्त्यांच्या मताचा कानोसाही घेण्यात आला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आमचे नियोजन सुरू आहे. ग्रामीण भागात आजही राष्ट्रवादी  काँग्रेसची ताकद कायम आहे. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे पक्षाकडे आहे. त्यामुळे याच ताकदीच्या बळावर आणि विकासाच्या भूमिकेवर आम्ही जास्तीत जास्त ग्रामपंचायती  जिंकून दाखवू. पक्षाचे सर्वच नेते आता राबत आहेत. तालुकानिहाय किंवा गावनिहाय प्रतिस्पर्धी पक्ष व गट बदलत जातात. त्यामुळे आम्ही जिल्ह्यासाठी एकच धोरण  न ठेवता, स्थानिक परिस्थितीवर अवलंबून नियोजन करीत आहोत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार आणि शिवसेनेचे नेते विनायक राऊत शिवसेनेच्या यशाबाबत ठाम आहेत. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत शिवसेनेचा  आलेख सातत्याने वर जाणारा आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीपासून नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत जनतेने शिवसेनेवरच सर्वात जास्त  विश्‍वास व्यक्त करून सत्तास्थाने दिली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील ताकद सिद्ध केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठीही आमची तयारी  सुरू आहे. गावपातळीवर स्थानिक परिस्थितीनुसार आघाड्या होणार असल्या तरी शिवसेनेच्या विचाराचे लोक प्रत्येक ठिकाणी असावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू  आहेत. प्रत्येक तालुका पातळीवर नियोजन केले जात आहे. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमधील आमचा समन्वय चांगला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगली  भावना आहे. केंद्र व राज्यातील सत्तेनंतर आजअखेर अनेक लोकोपयोगी निर्णय आम्ही घेतलेले आहेत. निश्‍चितपणे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती आमच्या ताब्यात  येतील. सरपंचपदांच्या शर्यतीतही आमचा पक्ष बाजी मारणार आहे. स्थानिक पातळीवर अनेकांचे पक्षप्रवेश सुरू आहेत. येतील त्या सर्व चांगल्या लोकांचे आम्ही  स्वागत करीत आहोत. पक्षाची व्याप्ती वाढविताना आम्ही विकासाचे धोरण तेच ठेवले आहे. पक्षांतर्गत कुठेही वाद नाहीत. स्थानिक पातळीवर जर कुठे वाद निर्माण  होत असतील, तर ते समन्वयाने मिटविण्याची जबाबदारी तालुकाध्यक्षांना दिली आहे. ग्रामपंचायतींवरही शिवसेनेचेच वर्चस्व राहणार आहे.