Breaking News

शेतकरी विषबाधा : काँग्रेसची पाच सदस्यीय समिती

मुंबई, दि. 06, ऑक्टोबर - शेतकरी विषबाधा मृत्यू प्रकरणी परिस्थितीची पाहणी तसेच बाधित शेतकरी कुटूंबियांची भेट घेणे व वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी  प्रदेश काँग्रेसने विधानसभा उपगटनेते विजय वडेट्टीवार अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय आमदारांची एक समिती गठीत केली आहे.
विषबाधेच्या घटनेने संपुर्ण राज्य हादरले आहे. कपाशीवरील कीड आटोक्यात आणताना विषबाधा होऊन एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 22 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला.  750 हून अधिक शेतकरी अत्यवस्थ आहेत. बुलडाणा जिल्ह्यात विषबाधेने 11, तर अकोला सामान्य रूग्णालयात 8 जणांचा मृत्यू झाला. दररोज 30 ते 35 नवीन  रुग्ण दवाखान्यात दाखल होत आहेत. विषबाधेमुळे 25 हून अधिक शेतकर्‍यांना कायमचे अंधत्व व मेंदूवर विपरित परिणाम झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसची समिती शनिवार दि. 7 ऑक्टोबर रोजी यवतमाळ व त्यानंतर उर्वरित जिल्ह्याचा दौरा करणार असून बाधित गावात जाऊन प्रत्यक्ष  परिस्थितीची पाहणी करणार आहेत. या विषबाधेच्या घटनेचा व परिणामांचा अभ्यास करुन विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात या बाधित कुटूंबांना न्याय  मिळवून देण्यासाठी सरकारला धारेवर धरण्याचे काम करणार आहेत. या समितीमध्ये आ. विरेंद्र जगताप, आ. राहूल बोंद्रे, आ. यशोमती ठाकूर, आ. अमित झनक हे  सदस्य आहेत, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी दिली.