Breaking News

स्काऊट आणि गाईडसने स्वच्छतेसाठी योगदान दिल्यास महाराष्ट्र हे देशातले सर्वात स्वच्छ राज्य होईल - राज्यपाल

मुंबई, १० ऑक्टोबर - देशभरात स्काऊट-गाईडसची संख्या 57 लाखाच्या आसपास असून एकट्या महाराष्ट्रात ही संख्या 15 लाख इतकी आहे. या सर्व स्काऊट आणि गाईडसने स्वच्छतेसाठी आपले योगदान दिल्यास महाराष्ट्र हे देशातले सर्वात स्वच्छ राज्य म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस, मुंबईच्या वतीने राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊटस् आणि गाईडस् आणि उत्कृष्ट स्काऊटर/गाईड यांचा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते सत्कार करुन त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
शिवाजी पार्क येथील स्काऊट गाईड पॅव्हिलियन येथे आयोजित कार्यक्रमास राज्याचे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, राज्य संस्थेचे अध्यक्ष ज्ञानोबा मुंढे आदी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल म्हणाले, स्काऊट आणि गाईड्स ही एक चळवळ असून, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून सरोजिनी नायडू यांच्यापर्यंत सर्व या चळवळीशी संबंधित होते. भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. या तरुणांना चांगले शिक्षण मिळण्याबरोबर चांगला व्यक्ती बनण्याचे शिक्षण मिळणेही आवश्यक असल्याचे राज्यपाल यावेळी म्हणाले.
स्वच्छ भारत अभियान यशस्वी करताना सर्वांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम केल्यास स्वच्छता ही एक दिवसाची न राहता ती कायमची सवय म्हणून स्वीकारली जाईल, त्यासाठी स्वच्छ महाराष्ट्रासाठी योगदान देण्याचे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले. शाळा,प्रार्थनास्थळे या सार्वजनिक स्थळांच्या स्वच्छतेबरोबरच पशू-पक्षी, जनावरांचे संरक्षण करुन महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षाही राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन 2014-15 व 2015-16 या दोन वर्षाच्या स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्रमाणपत्र, राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर गाईडर पुरस्कार, बार टू मेडल ऑफ मेरी आणि स्काऊट गाईड जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. मंगला उकिडवे आणि भूपेंद्र शहा यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.