जालन्यात महिलेचा गळा चिरून खून
जालना, दि. 06, ऑक्टोबर - जालना शहरातील मोतीबाग चौकामध्ये बुधवारी रात्री उशिरा एक महिलेचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचा प्राथमिक संशय असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. जालना शहरातील मोतीबाग परिसरातून रवी खिल्लारे हे आपल्या पत्नी कल्पना खिल्लारे (रा. बाजवेश्वरनगर, औरंगाबाद) यांच्या सोबत इंडिकातून (क्र. एमएच 20, सीएच 6450) जात होते. यावेळी सचिन सुपारकर याने इंडिका गाडीमधून कल्पना खिल्लारे यांना गाडीतून बाहेर काढून तू माझ्यावर प्रेम करत होती. मग तू दुसर्या सोबत लग्न का केले, असे म्हणत कल्पना खिल्लारे यांच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्यार्याने वार केला. यात कल्पना खिल्लारे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रवी खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी सचिन सुपारकर याला अटक केली आहे.