Breaking News

नाशकात मुसळधार पाऊस; गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग

नाशिक, दि, 12, ऑक्टोबर - नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून त्यामुळे नद्यांमधील पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम  असल्याने पुन्हा अनेक धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. सायंकाळीही पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ  झाली आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात चार दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकला आहे. दररोज दुपारच्या सुमारास हजेरी लावणार्या पावसाने बुधवारी मात्र सकाळपासूनच संततधार कायम  ठेवली. आज दिवसभर शहरात ऊन-पावसाचा लपंडाव सुरू होता. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.
दिंडोरी, इगतपुरी, निफाड, बागलाण, देवळा, येवला, मालेगाव, पेठ, चांदवड या तालुक्यांमध्ये हजेरी लावली. या पावसामुळे धरणांमधील पाणी पातळीत वाढ झाली असून गंगापूर आणि  दारणासह आळंदी, वालदेवी धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीमधील पाणी पातळीत वाढ होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. गोदाकाठावर असलेल्या दुतोंड्या  मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पातळी पोहोचली आहे.