Breaking News

राज्याच्या सर्व भागात बँकिंग नेटवर्कचा विस्तार आवश्यक - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 15, सप्टेंबर - महाराष्ट्राच्या विकासात सहकारी बँकांचे अतुलनीय योगदान असून बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. ज्या भागांमध्ये बँकिंग क्षेत्राच्या  नेटवर्कचा विस्तार झाला आहे. तेथे विकास अधिक झाली असून, राज्याच्या सर्व भागात हा विस्तार होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यानी आज येथे केले.
माटुंगा येथील श्री षण्मुखानंद सभागृहात सारस्वत बँकेच्या शतकमहोत्सवी वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी  केंद्रीय वाहतूक नदी विकास आणि गंगा पुनरूज्जीवन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू,भारतीय रिझर्व बँकेचे कार्यकारी संचालक  सुदर्शन सेन, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाचा सर्वात अगोदर वापर करणारी ही बँक असून, एका समुहासाठी तयार झालेल्या बँकेच्या कक्षा रुंदावून अनेक भागात ग्राहकांना  उत्तम सेवा देण्याचे आज काम करत आहे. सहकारी बँकांचे राज्याच्या विकासात अतुलनीय योगदान आहे. विकासामध्ये कॅपिटलचे महत्व खूप असत. बँकांजवळ आज  पैसा आहे, त्यांना चांगले ग्राहक हवे आहेत. भारत हा तरुणांचा देश म्हणून आज जगभरात ओळखला जातो. आणि आपण ज्या अर्थव्यवस्थेतून जातोय अशा  परिस्थितीत काम करण्याची मोठी संधी आहे, त्याचबरोबर बँकिंग आणि वित्तीय इन्स्टिट्यूट यांचे महत्व मोठे आहे. नीती आयोगाने काही दिवसांपूर्वी अहवाल प्रसिद्ध  केला आहे त्यात महाराष्ट्रात 5 लाख 96 हजार कोटीचे मोठे महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. त्या माध्यमातून उत्तम पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रमाणात रोजगार  निर्मिती होणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगून सारस्वत बँकेच्या 100 वर्षाच्या यशस्वी वाटचालीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस  त्यांनी शुभेच्छा दिल्या.
केंद्रीय वाहतूक मंत्री श्री. गडकरी यावेळी म्हणाले, सहकार चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रात कृषी आणि उदयोग क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. कुठल्याही क्षेत्रात  तंत्रज्ञानापेक्षाही विश्‍वसनियता अधिक महत्वाची असते सारस्वत बँकेचे हे यश प्रामाणिकपणा, विश्‍वासनीयतेचे आहे. सहकारी बँकांचे योगदान भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ  करण्यात मोलाचे योगदान आहे. केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू, म्हणाले, बँकेने कमी काळात, लोकांचा विश्‍वास संपादन केला आहे लोकांच्या मदतीने  100 वर्षचा प्रवास पूर्ण केला आहे. सर्वांनी कुटुंब या भावनेने काम करून बँकेचा विस्तार वाढविली आहे. यशाचे उत्तम उदाहरण म्हणजे सारस्वत बँक होय. भविष्यात  बँकांना वेगळ्या आव्हानाना सामोरे जायचे आहे. सारस्वत बँकेत मात्र सर्व आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता आहे.