Breaking News

निळवंडे, भंडारदर्‍याच्या पाण्यावर अकोल्याच्या जनतेचा पहिला हक्क

माजी मंत्री मधुकरराव पिचड; हक्क डावलल्यास आंदोलनाचाही इशारा 

अकोले, दि. 09 - धरणे आमच्याच  तालुक्यात पुनर्वसनही आमच्याच तालुक्यात, धरणग्रस्तांचे शमभर टक्के पुनर्वसन झाले पाहिजे. अकोले तालुक्यातील पाण्यावर  तालुक्यातील जनतेचा पहिला हक्क असून हा हक्क डावलला तर पाण्याचा एक थेंबही खाली जाऊ देणार नाही. आज आम्ही जितक्या आनंदाने जलपूजन करतोय  त्यापेक्षा अधिक आक्रमक पणे आंदोलन करु असा इशारा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी दिला आहे.                                                  
निळवंडे धरणाच्या जलपूजन प्रसंगी पिचड बोलत होते. धरणग्रस्त शेतकर्‍यांच्या हस्ते धरणाच्या पाण्याचे साडी चोळी खण नारळ अर्पण करून पूजन करण्यात आले.  यावेळी आमदार वैभवराव पिचड, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, जेष्ठ नेते  मीननाथ पांडे, अगस्ति साखर कारखान्याचे संचालक सुरेश गडाख, अशोक देशमुख, राजेंद्र डावरे, गुलाब शेवाळ सुनील दातीर, कार्यकारी संचालक भास्कर घुले,  राष्ट्रवादीचे अध्यक्ष गिरजाजी जाधव, सेक्रेटरी यशवंत आभाळे, युवक नेते विकास शेटे, दूध संघाचे संचालक गोरक्ष मालुंजकर, रमेश जगताप उपस्थित होते. धरणग्रस्त  विठल आभाळे, रामहरी आवारी, देविदास कोकणे, हरिभाऊ पथवे आदींच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
यावेळी धरणग्रस्तांच्या वतीने मधुकरराव पिचड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पिचड बोलताना पुढे म्हणाले कि, राज्यात व जिल्ह्यात निळवंडयाचे श्रेय  घेण्यावरून भांडणे चालू आहे. अनेक अडचणीतून हे धरण पूर्ण झाले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले ,तेव्हा कुणी त्यांच्या मदतीला आले का? धरणग्रस्तांना जमिनी  मिळवू नये म्हणून काही लोक कोर्टात गेले. बाळासाहेब थोरात सोडले तर कुणीही मदत केली नाही. अन पाण्यावर हक्क सांगायला सगळेच पुढे. राज्यातले सरकारही  गमतीशीर आहे, लोकप्रतिनिधींचे हक्क काढून घेऊन धरणातील पाणी सोडण्यासाठी नियामक समिती सरकारने नेमली. यात  कोण आहे? मुख्य अभियंता, अधीक्षक  अभियंता, जलविदुत प्रकल्पाचा अधिकारी, डॉडसन, निळवंडेचा ठेकेदार? आता याना पाणी सोडण्याचा अधिकार सरकारने दिला आहे. पाणी हे आमच्या हक्काचे  असून त्यावर आमचा पहिला अधिकार आहे. धरण भरल्यावर आनंद होतो पण त्यात बुडाला त्याच्या डोळ्यात मात्र पाणी असते. कालवा सल्लागार समितीचा हक्क  कायम ठेवला पाहिजे. हे पाणी विकले जाईल अन तालुका उजाड व्हायला वेळ लागणार नाही. मी कुठल्याही कंपनीचा एजंट नाही, मी जनतेचा एजंट आहे. वेळ पडली  तर पाण्यासाठी चाक बंद करू. असाही इशारा पिचड यांनी दिला.
शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याच्या नावाखाली सरकारने विकास कामे थांबवली पण  शेतकर्‍यांना कर्जमाफीचा फायदा झाला का? राज्यातले हे सरकार शेतकरी विरोधी  असून शेतकर्‍यांना उध्वस्त करीत आहे. 2019 च्या निवडणुकीत चले जावचा नारा देऊन हे सरकार हुसकावे लागेल, असेही पिचड म्हणाले.
आमदार वैभवराव पिचड म्हणाले कि, धरणाचे काम पूर्ण झाले पण कालवांची कामे अपूर्ण आहे त्यासाठी शासनाने निधी द्यावा. धरणग्रस्त शेतकर्‍यांचे प्रश्‍न मार्गी  लावावे, असे आ. पिचड म्हणाले. यावेळी मीनानाथ पांडे, विठ्ठलराव आभाळे, गिरजाजी जाधव मधु पिचड यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचलन यशवंत आभाळे यांनी  केले.