लडाखमध्ये रस्तेबांधणीचा भारताचा निर्णय अयोग्य - चीन
बीजिंग, दि, 25, ऑगस्ट - लडाखमधील पेंगोंग सरोवराजवळ रस्तेबांधणीचा भारताचा निर्णय अयोग्य असून त्याने भारत आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत असल्याचे चीनने म्हटले आहे. या निर्णयामुळे भारत व चीनदरम्यानचा डोकलाममधील तणाव अधिक वाढेल, असा इशाराही चीनकडून देण्यात आला आहे. भारताने लडाख सेक्टरमधील पेंगोंग सरोवरापर्यंतच्या रस्तेबांधणीस परवानगी दिली आहे. मात्र, त्याभागातील सीमा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे असे पाऊल उचलून भारताने फार मोठी चूक केली आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सांगितले. ते म्हणाले की , भारताच्या भूमिकेत व कृतीत विरोधाभास असल्याचे या निर्णयामुळे स्पष्ट होत आहे. या भागात रस्ते बांधणीसाठी देण्यात आलेल्या मंजूरीमुळे शांतता व सद्भावनापूर्ण वातावरण बिघडणार आहे, असेही ते म्हणाले.