Breaking News

जलयुक्त शिवारासाठी आलेला निधी काळजीपूर्वक खर्च करा - सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 23 - पाण्याचा प्रत्येक थेंब जीवनाशी निगडीत आहे. सिंचन विभागाचे नांव जलसंपदा करण्यात आल्याने एकप्रकारे पाणी ही आपली संपत्ती आहे.  राज्यातील पाणी टंचाई दूर करुन शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या अभियानात स्वयंसेवी  संस्था, लोकसहभाग तसेच उद्योजक सहभागी होत आहेत. त्याचाच भाग म्हणून मुंबईच्या सिध्दीविनायक ट्रस्टने जलयुक्त शिवारासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध  करुन दिला आहे. हा एकप्रकारे बाप्पाचा शेतक-यांना प्रसाद असल्याने या कामासाठी आलेल्या निधीचा अधिका-यांनी काळजीपूर्वक उपयोग करावा, असे आवाहन  वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवन येथे जलयुक्त शिवारासाठी उपलब्ध केलेल्या निधीच्या धनादेश वाटप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर  जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, प्रभारी जिल्हाधिकारी संजय धिवरे, जिल्हा परिषदेचे  उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, सिध्दीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे, विश्‍वस्त ड. हरिष सणस, महेश मुदलीयार, स्मिता बांद्रेकर उपस्थित होत्या. सिध्दीविनायक ट्रस्टतर्फे  गतवर्षीसुध्दा जलयुक्त शिवारासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता, असे सांगून सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या ट्रस्टमध्ये गोळा होणारा प्रत्येक पैसा भक्तांचा  आहे. भक्तांच्या पैशातून शेतक-यांसाठी मदत होत आहे, ही गौरवास्पद बाब आहे. आलेला प्रत्येक पैसा शासकीय यंत्रणेने योग्य ठिकाणी खर्च करावा. एकप्रकारे  शेतक-यांचे जीवनमान उंचविण्यासाठी चांदयापासून बांदयापर्यंत सिध्दीविनायक ट्रस्टचा हा आशीर्वाद प्रत्येक जिल्हयात पोहचत आहे. ज्या गावात या निधीतून कामे  होत आहे, तेथे सिध्दीविनायक ट्रस्टचे फलक लावावे. जेणेकरुन ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती प्रत्येकाला होईल. जलयुक्त शिवार या अभियानातून राज्याचा  कायापालट होणार असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. ट्रस्टच्या धनादेशरुपी प्रसादाचा उपयोग शेवटच्या माणसापर्यंत पोहचेल याची अधिका-यांनी काळजी  घ्यावी, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागपूर महसूल विभागातंर्गत नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया तसेच अमरावती महसूल विभागातंर्गत यवतमाळ, अकोला, अमरावती,  बुलडाणा व वाशिम अशा एकूण 10 जिल्हयांसाठी प्रत्येकी 1 कोटी याप्रमाणे 10 कोटींच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. नागपूर विभागाचे प्रतिनिधी म्हणून  उपायुक्त श्री.बोंदरे यांनी तर अमरावती विभागाचे प्रतिनिधी म्हणून उपायुक्त श्री.मावसकर यांनी धनादेश स्वीकारले. यावेळी सिध्दीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे  तसेच हरीष सणस यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमाबद्दल माहिती दिली. तत्पूर्वी ट्रस्टच्या वतीने जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सिध्दीविनायकाची  प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अण्णासाहेब हसनाबादे यांनी तर संचालन नायब तहसिलदार कांचन जगताप यांनी  केले.  मा.मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवारासाठी केलेल्या आव्हानाला सिध्दीविनायक ट्रस्टने तात्काळ प्रतिसाद देऊन निधी उपलब्ध करुन दिला. महाराष्ट्रातील 34  जिल्हयांना प्रत्येक 1 कोटी या प्रमाणे 34 कोटी रुपये मार्च व एप्रिल 2015 मध्ये वितरीत केले होते. यानंतर मार्च 2016 मध्ये प्रती जिल्हा 19 लक्ष 11 हजार रुपये  याप्रमाणे 34 जिल्हयांना 6 कोटी 50 लक्ष रुपये अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले होते.