नाफेडचा गलथान कारभार पाहून आ.बोंद्रेंचा रूद्रावतार!
चिखलीत बारदाण्याअभावी तुर खरेदी बंद; 54 दिवसापासूनचे चुकारे थकल्याने अधिकार्यांना धरले धारेवर
बुलडाणा, दि. 01 - शेतकर्यांकडून शासकीय तुर खरेदी केंद्रावर तुर खरेदीची मुदत आज संपली, त्याअनुशंगाने तुर खरेदीच्या परिस्थीची पाहणी करण्यासाठी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी नाफेडच्या चिखली स्थित खरेदी केंद्राला भेट दिली असता, बारदाण्याआभावी या खरेदी केंद्रावर तुरीची खरेदीच बंद असल्याचे पाहून त्यांनी रूद्रावतार धारण केला. खरेदी केंद्रावर ताटकळून असलेले शेतकरी व कामगार यांची यामुळे झालेली अडचण पाहता त्यांनी अधिकार्यांना धारेवर धरले. तात्काळ नाफेडच्या जिल्हा स्तरीय अधिकार्यांनी चिखली केंद्रावर बारदाणा पोहचवून मोजमापाला सुरूवात केली. यावेळी चिखली खरेदी केंद्रावर मागील 22 तारखेपासून खरेदी करण्यात आलेल्या तुरीच्या काटापट्टया नाफेडकडून आजवर देण्यात आल्या नसल्याची व 7 एप्रिलपासून पुढचे चेक शेतकर्यांना मिळाले नसल्याची बाबही यावेळी समोर आल्याने जिल्ह्यात विक्रीसाठी नोंदणी झालेल्या 4 लाख क्विंटल तुरी व खरेदीची संथगती पाहून याच पध्दतीने शासकीय खरेदी सुरु राहिल्यास पुढच्या तुरी शेतातून बाहेर येईपर्यंत तरी नोंदणी झालेल्या तुरीचे मोजमाप होणार का? व चुकारे शासन शेतकर्यांना देणार की नाही, अशी शंका व्यक्त करून केवळ शेतकर्यांचा प्रतिसाद नसलेल्या संवाद यात्रेने भागणार नाहीत तर खरिपाची येवून ठेपलेली वेळ पाहता प्रत्यक्ष शेतकर्यांना मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे आमदार बोंद्रे यांनी सांगितले.शेतकर्यांच्या घरातील शेवटचा दाणा असेपर्यंत तुर खरेदी करणार या आपल्या आश्वासनावरून शासनाने घुमजाव केले आहे. या मागणीसाठी व खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे तातडीने मिळण्यासाठी आमदार राहुलभाउ बोंंद्रे यांनी आमरण उपोषण केल्यावर खरेदी केलेल्या तुरीचे पैसे शासनाला तातडीने उपलब्ध करून द्यावे लागले. मात्र तुर खरेदी संदर्भात शासनाकडून नाफेडच्या खरेदी केंद्रावर अक्षम्य दिरंगाई केली जात असल्याची बाब उपलब्ध आकडेवारीवरून समोर येते आहे. बुलडाणा जिल्ह्यात 13 नाफेडच्या खरेदी केंद्रांवर 4 लाख क्विंटल पेक्षा जास्त तुरीची नोंदणी शेतकर्यांनी केलेली आहे. चिखली नाफेड खरेदी केंद्रावर खरेदीची 31 मे 2017 ही मुदत संपन्याच्या एक दिवस आगोदर 90 हजार क्विंटल तुरीची विक्रीसाठी नोंदणी शेतकर्यांनी केली आहे. चिखलीत मात्र 22 मे ते 31 मे 2017 पर्यंत केवळ 17 हजार क्विंटलचे मोजमाप झाले असून त्याच्या काटा-पटयाही अद्याप शेतकर्यांना देण्यात आलेल्या नसल्याने त्यांना चुकारे मिळण्यासही विलंब होणार आहे. तर जिल्हयात नोंदणी झालेली तुर कधी मोजली जाणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चिखलीतील प्रकाराबद्दल त्यांनी खरेदी विक्री संस्थेचे व्यवस्थापकास धारेवर धरीत अद्याप पावत्या न देणे या मागील कारणांची विचारणा केली व पावत्या नाहीत मात्र नोंद तरी आहे काय, असा प्रश्न करून बारदाण्याची मागणी वेळेपूर्वी का होत नाही, व चुकारे कधी मिळतील असी विचारणा केली. चिखली केंद्रावरील या परिस्थिीतीपेक्षा जिल्हयातील इतर नाफेडच्या खरेदी केंद्रावरील परिस्थिीती यापेक्षाही दयनिय आहे. त्यामुळे येणारे खरीप हंगामात या तुरीच्या पैशातून शेतकर्यांना पेरणी करता येईल काय याचीच शंका निर्माण झाली आहे.
चिखली स्थित नाफेडच्या खरेदी केंद्राला भेट दिली असता आमदार राहुलभाउ बोंद्रे यांचे समोर आलेल्या या परीस्थितीवर चिंता व्यक्त करतानांच भाजपाचे पदाधिकारी संवाद यात्रा काढून शासकीय योजनांची माहिती शेतकर्यांना देत असल्याचा ढोल पिटला जातो आहे. मात्र शेतकर्यांच्या या ज्वलंत व पेरणीसाठी महत्वपुर्ण प्रश्नाकडे सर्व भाजपाचे पदाधिकारी हेतुपुरसर डोळेझाक करीत आहे. शेतकर्यांना प्रलोभने दाखविण्यापेक्षा या प्रश्नी लक्ष घालून त्यांच्या तुरीचे हक्काचे पैसे त्यांना उपलब्ध करून देण्याची नितांत गरज असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या भेटीवेळी बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी, संचालक रूपराव पाटील, गजानन पवार, संचिव अजय मिरकट, नायब तहसिलदार शेलार, मंडळ अधिकारी पाटील, शिवराज पाटील, प्रमोद पाटील, अमिनखॉ उस्मानखॉ, राजु सुरडकर व अनेक शेतकर्यांची उपस्थिती होती.