Breaking News

शेतकरी संपावर : संपाचा सातवा दिवस, सरकारविरोधात आज मौन आंदोलन

मुंबई, दि. 07 - शेतकर्‍यांच्या सात दिवसाच्या संपाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज सरकारच्याविरोधात मौन आंदोलन केलं जाणार आहे. सरकार बहिरं आहे. त्यामुळे त्याला ऐकू येत नाही म्हणून मौन आंदोलन केलं जाणार आहे. शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा सुकाणू समितीच्या वतीनं ठरवण्यात येणार आहे. ज्या प्रमाणे जीएसटीसाठी विशेष अधिवेशन घेतलं, त्याप्रमाणे शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन घ्या अशी मागणीही या शेतकर्‍यांनी केली आहे.
नाशिकसह पुण्यामध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यानं भाज्यांचे दर उतरले आहेत. सामान्य शेतकर्‍यांनी संपाला कंटाळत बाजारात शेतमाल नेणंच पसंत केलं आहे. त्यामुळे आवक वाढल्यानं भाजीपाल्यांचे दर पूर्वपदावर येऊ लागले आहेत. नाशिकमध्येही भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पोचला आहे. तर पुण्यामध्येही भाजीपाल्याची आवक 70 टक्के झाली आहे. दरम्यान काल मंगळवारी पुणतांब्यातील काही शेतकर्‍यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत शेतकर्‍यांनी राज ठाकरेंना संपाचं नेतृत्त्व करण्याची विनंतीही केली.
दरम्यान काल मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन गरजू शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळणार असल्याचा पुनरुच्चार केला. कर्जमाफीबद्दल केवळ शेतकर्‍यांशीच चर्चा केली जाईल आणि निर्णय घेतला जाईल. त्यासाठी 4 महिन्यांचा वेळ लागणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.