Breaking News

वसंतदादा भाडेतत्त्वावर देण्यास सभासदांचा हिरवा कंदील

सांगली, दि. 30 - आर्थिक अरिष्टामुळे बंद पडलेला सांगली जिल्ह्यातील बहुचर्चित असा वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना मुंबई येथील श्री दत्त इंडिया या  कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात यावा, असा ठराव साखर कारखान्याच्या सोमवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. करार  प्रक्रिया झाल्यानंतर आठ दिवसात शेतकरी व कामगार यांची थकित देणी तात्काळ दिली जातील, या साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या  आश्‍वासनानंतर आवाजी मतदानाने हा विषय मंजूर झाला.
गेली काही वर्षे कर्जाच्या खाईत रूतत चाललेला वसंतदादा शेतकरी साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामात अवघ्या 81 हजार मेट्रिक टन ऊस गाळपानंतर बंद  करावा लागला होता. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व अन्य घटक यांची सुमारे 450 कोटी रूपये देणी असलेल्या या साखर कारखान्याचा सांगली जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँकेने त्यांच्या 93 कोटी रूपये कर्जापोटी प्रतिकात्मक ताबा घेतला होता. हा साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची निविदा प्रक्रिया जिल्हा  मध्यवर्ती बँकेने राबविल्यानंतर अग्रक्रमाने श्री दत्त इंडिया ही कंपनी पात्र ठरली होती.
सोमवारी झालेल्या साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्री दत्त इंडिया कंपनीस हा साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यायचा की नाही? या  विषयाबाबत सविस्तर चर्चा झाली. साखर कारखाना सभासदांनी हा करार पारदर्शी व्हावा, तासगाव सहकारी साखर कारखान्याप्रमाणे या साखर कारखान्याच्या  भाडेकराराचेही होऊ नये, इतर सहकारी साखर कारखान्यांप्रमाणे सभासदांना शेअर्सची साखर मिळावी व थकित देणी व ठेवीच्या रकमा तात्काळ मिळाव्यात आदी  मागण्या केल्या.
त्यावर विशाल पाटील म्हणाले, की हा साखर कारखाना व्यवस्थित सुरू राहू नये व भाडेतत्त्वावर चालविण्यास न देता तो बंदच पडावा, या हेतूने काही राजकीय  मंडळींचा आधार घेऊन शेतकरी संघटनेचे नेते न्यायालयात गेले आहेत. मात्र त्यांचा हा हेतू तडीस जाऊ न देता सभासद व कामगार हितासाठी हा साखर कारखाना  भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची गरज आहे, असे सांगत विषयपत्रिकेनुसार ठराव मांडला. थकित देयके तात्काळ दिली जातील, या खुलाशानंतर सभासदांनी हा  ठराव मंजूर केला. या साखर कारखान्याचा डिस्टिलरी प्रकल्पही भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचाही निर्णय घेण्यात  आला.
या सभेस साखर कारखान्याचे संचालक डी. के. पाटील, राजेंद्र एडके, विक्रम पाटील- सावर्डेकर, रणजित पाटील- सावर्डेकर व सुनील आवटी यांच्यासह सर्व  संचालक, ऊस उत्पादक शेतकरी व कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.