सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना भाजपाचे पॅनेल विजयी
औरंगाबाद ,दि. 23 : औरंगाबाद जिल्ह्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे पॅनेल विजयी झाल्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
मराठवाड्यात ग्रामीण भागात शेतकर्यांच्या पाठिंब्याने सहकारी साखर कारख्यान्याच्या निवडणुकीत भाजपा विजयी झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या कारखान्यात भाजपाची सत्ता होती. मतदारांनी पुन्हा एकदा भाजपाला कौल दिला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी ही निवडणूक लढविली. या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार एकोणावीस संचालकपदांवर विजयी झाले. तेरा उमेदवारांचा आज निवडणुकीत विजय झाला तर सहा उमेदवार या पूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड व फुलंब्री तर जालना जिल्ह्यातील भोकरदन असे तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. या निवडणुकीत तीन तालुक्यातील अकरा हजार सहाशे मतदार होते.