वीज पडून नांदेड जिल्ह्यात तिघे ठार
नांदेड, दि. 12 - नायगाव बाजार, विजेचा कडकडाट व वादळी वा-यासह गारपीट सुरू झाल्याने शेतातील लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या तीन शेतमजूरावर विज पडल्याने तिघेही जागीच ठार झाल्याची घटना काल (12 मे)सायंकाळी 5.45 वाजताच्या दरम्यान डोनगाव बु. ता. बिलोली येथे घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. डोनगाव बु. येथील खुर्शिद बाबु शेख (35), यादराव चादोबा वाघमारे (50) व बाबु राजेश यंकम (14) हे तिघेही तेथीलच शेतकरी माधवराव मोरडे यांच्या शेतात काम करीत होते. सायंकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान वादळी वारे सुटले त्यातच विजेचा गडगडाट होऊन गारांचा मारा सुरु झाल्याने शेतात काम करणारे वरील तीनही मजूरांनी गारा पासून बचाव करण्यासाठी शेतातील लिंबाच्या झाडाखाली थांबले असता तेथेच तिघावरही विज पडल्याने 1 खुर्शिद बाबु शेख, यादराव चांदोबा वाघमारे व बाबु राजेश यकम हे तिघे जागीच ठार झाले. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून मयत शेख यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत तर वाघमारे यांच्या पश्चातही पत्नी व मुले असून यंकम हा 14 वर्षाचा तरुण आहे.
