Breaking News

भंडार्‍यातील कार्कापुरात अग्नितांडव

भंडारा, दि. 24 - 10 घरं पेटली अनेक गोठ्यांची राखरांगोळी झाली चार्‍यांच्या साठ्याला आग लागली भंडार्‍याच्या कार्कापूर गावात गेल्या आठवड्याभरात अग्नितांडव सुरु आहे. एका आठवड्यात 10 घरांना आग लागल्यानं गावात दहशत पसरली आहे. मात्र आगीचं कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे.
इतकंच नाही, तर रात्री बेरात्री घरावर शेंदूर फासलेली दगडं पडत असल्याचा दावा गावकरी करत आहेत. धास्तावलेल्या गावकर्‍यांनी पोलीस आणि प्रशासनाकडे धाव घेतली. प्रशासनानं या गावकर्‍यांची समजूत घातली. हा प्रकार उन्हामुळे किंवा एखाद्या समाजकंटकांमुळे झाल्याची शक्यता वर्तवली. पण गावकरी मात्र ऐकायला तयार नाहीत. हा भूतबाधेचा प्रकोप असल्याचा दावाच गावकर्‍यांनी केला आणि अखेर देवाचा धावा करण्यास सुरुवात केली. अचानक सुरु झालेल्या अग्नितांडवाने गावकर्‍यांच्या मनातच अंधश्रद्धेने आगडोंब उसळला आहे. त्यामुळे अंनिस आता या गावात जनजागृती करणार आहे. या घटना निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मितही असू शकतात. त्यामुळे प्रशासनाने आधी गावकर्‍यांच्या मनातली भीती दूर करण्याची गरज आहे. कारण भीती हेच अंधश्रद्धेमागचं सर्वात मोठं कारण असतं.