Breaking News

शेतीसाहित्याची खरेदी, 22 पिकांना हमीभाव, कर्जमुक्तीसाठी सरकारचा मेगा प्लॅन

मुंबई, दि. 15 - उत्तर प्रदेश सरकारने कर्जमाफी दिल्यानंतर महाराष्ट्रातही शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी ही मागणी विरोधकांनी आणि शिवसेनेने लावून धरली. पण कर्जमाफी हा एकमेव उपाय नसून कर्जमुक्तीसाठी सरकारने इतर पर्यायांवर अभ्यास सुरू केला आहे. यासाठी सरकारचा दोन कलमी कार्यक्रम आखण्याचा विचार आहे. शेतकर्‍यांना कोणत्या गोष्टी खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं, त्याचा अभ्यास करुन या गोष्टी सरकार स्वतः खरेदी शेतकर्‍यांना खरेदी करून देणार आहे. तर दुसरा उपाय म्हणजे शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव द्यायचा. राज्यातील 22 पिकांना सरकार स्वतः हमी भाव देण्याच्या विचारात आहे.
पीक घेताना शेतकर्‍यांचा प्रामुख्याने बियाणे, खत, शेतमजूर, पाणी आणि वीज यांसारख्या गोष्टींवर खर्च होतो. या प्रामुख्याने लागणार्‍या गोष्टी स्वतः खरेदी करून एनजीओ किंवा विविध संस्थांच्या माध्यमातून पुरवण्याचा सरकारचा विचार आहे.
पावसाळ्यापूर्वी ज्यांची कर्ज थकीत आहेत, ज्यांना पीक कर्ज मिळणार नाही, त्या शेतकर्‍यांना बियाणे, खतं, किटकनाशकं पुरवण्याचा सरकारचा विचार आहे. शेतकर्‍यांना पैसे न देता या गोष्टी खरेदी करून शेतकर्‍यांना दिल्या जातील. यातून पाच एकर पर्यंत शेती असणार्‍या शेतकर्‍याचं उत्पादन मूल्य शून्य करण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे त्यांना कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. पाच एकर शेती असलेल्या शेतकर्‍यांसाठी हा उपाय केल्यास साधारण चार हजार कोटी खर्च होईल. राज्यात पाच एकरपर्यंत शेती असणारे पाच कोटी शेतकरी आहेत. मनरेगाच्या माध्यमातून शेतीच्या कामाला शेतमजूर दिले जातील. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतमजुरीचा खर्च येणार नाही.