Breaking News

कटक वन डेत टीम इंडियाचा विजय निश्‍चित

मुंबई, दि. 18 - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डेत टीम इंडियाने शानदार विजय साजरा केल्यानंतर पुढील सामना कटकमध्ये खेळवला जाणार आहे. कटकचं बाराबती स्टेडिअम टीम इंडियासाठी अनेक कारणांनी फायद्याचं ठरलेलं आहे. या मैदानावर भारताने गेल्या दहा वर्षात पाच सामने खेळले असून सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. त्यामुळे कटक स्टेडिअम भारतासाठी सर्वात लकी स्टेडिअमपैकी एक समजलं जातं.
भारताने या मैदानावर गेल्या दहा वर्षात खेळलेल्या पाच सामन्यांपैकी 2008 साली इंग्लंडविरुद्धही एक सामना खेळला आहे. या सामन्यात भारताने इग्लंडला सहा  विकेटने धूळ चारली होती. शिवाय भारताने पाचपेक्षा अधिक सामने खेळलेलं आणि त्या सर्वांमध्ये विजय मिळवलेलं बाराबती हे एकमेव स्टेडिअम आहे. या  स्टेडिअममध्ये भारताला अखेरचा पराभव 2003 साली न्यूझीलंडविरुद्ध स्वीकारावा लागला होता. सध्याच्या संघातील युवराज सिंह हा एकमेव खेळाडू त्या पराभव  झालेल्या सामन्यामध्ये सहभागी होता. त्यानंतर भारताने वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेला प्रत्येकी दोन वेळा, तर इंग्लंडला एकदा पराभवाची धूळ चारली आहे.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात आलेला सामना पावसामुळे रद्द झाला होता.
भारताने सर्वाधिक 12-12 सामने कोलंबो आणि दाम्बुलाच्या मैदानावर खेळलेले आहेत. कोलंबोमध्ये 12 पैकी 9 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला आहे, तर  3 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर दाम्बुलामध्ये सात विजय आणि पाच पराभव स्वीकारावे लागले आहेत. बाराबतीमध्ये भारताने आतापर्यंत  एकूण 15 सामने खेळले आहेत. यापैकी 11 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे इंग्लंडनेही या  मैदानात पाच सामने खेळले असून त्यापैकी तीन सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आलेलं आहे. यामध्ये 1989 साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या नेहरु  कप मालिकेतील सामन्याचाही समावेश आहे.