निवृत्ती घेणार होतो, विराटने विश्वास दाखवला : युवराज
भुवनेश्वर, दि. 20 - टीम इंडियाचा धडकेबाज फलंदाज युवराज सिंहनं इंग्लंडविरुद्ध 150 धावांची खेळी करुन टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. वनडे कारकीर्दीतील ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली. सुमारे तीन वर्षांनी टीम इंडियात पुनरागम करणार्या युवीने धाकड फलंदाजी केली. त्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र या सामन्यानंतर युवराजने त्याची आपबिती सांगितली. युवी म्हणाला, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय करण्याचा निर्णय जवळपास घेतला होता. कॅन्सरला हरवून मी मैदानात पुन्हा परतलो होतो. मात्र तरीही माझी मैदानातील कामगिरी चांगली होत नव्हती. त्यामुळे माझी टीम इंडियात निवड होऊ शकली नव्हती. परिणामी खचलेल्या मनाने क्रिकेटला गुडबाय करण्याचा निर्णय घेतला होता, असं युवी म्हणाला. युवराज आणि धोनीच्या द्विशतकी भागीदारीमुळे टीम इंडियाला इंग्लंडसमोर 381 धावांचा डोंगर उभा करता आला. त्याबाबत युवराज म्हणाला, मी आणि धोनीने यापूर्वी अनेक भागीदारी केल्या आहेत. धोनी हा अनुभवी खेळाडू आहे. तो त्याचा अनुभव मैदानात वापरत असल्याचं प्रत्यक्ष पाहणं हा एक मोठा अनुभव आहे यावेळी युवराजने कर्णधार विराट कोहलीचं नाव घेणंही विसरला नाही. विराटने माझ्यावर खूप विश्वास दाखवून मला पाठिंबा दिला. त्यामुळेच मी कारकिर्दीतील सर्वोच्च अशी 150 धावांची खेळी करु शकलो असं युवराज म्हणाला.
