Breaking News

उद्धव ठाकरे संयमी नेते, युतीचा पुनर्विचार करतील: चंद्रकांत पाटील

अकोला, दि. 28 - भविष्यात भाजपशी कोणतीही युती नाही, अशी भाषा ठिक नाही. उद्धव ठाकरे हे संयमी नेते आहेत, ते याचा नक्कीच पुनर्विचार करतील अशा आशावाद राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे. ते अकोला येथे बोलत होते.
काल उद्धव ठाकरे यांनी गोरेगावमधील शिवसेनेच्या मेळाव्यात युतीच्या काडीमोडाची घोषणा केली. यानंतर भाजपकडून मुंबईसाठी जोरदार तयारी सुरु असताना, दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या पुनर्विचाराची भाषा करुन स्वपक्षातील नेत्यांना धक्का दिला आहे. अकोल्यामध्ये बोलताना त्यांनी युती तुटल्यामुळे मतविभाजनाचा फायदा काँग्रेसला होण्याची भिती व्यक्त करुन युतीसाठी उद्धव ठाकरे पुनर्विचार करतील असं मत नोंदवलं आहे.
याशिवाय, मुंबईतील युती तुटल्यावरही राज्यातील इतर भागात युती राहू शकली असती असं सांगून निवडणुुकीनंतर कल्याण-डोंबिवली प्रमाणे दोघेही एकत्रित येऊ शकतील असे संकेत दिले आहेत. दरम्यान, युती तुटल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपला चर्चेसाठी येण्यासाठी आवाहन केलं होतं. त्याची खिल्ली उडवत, भाजप-शिवसेना युतीचं सरकार पाच वर्षांचा आपला कार्यकाळ पुर्ण करेल. त्यामुळे युती तुटल्यानं उगीच कुणी मनातल्या मनात मांडे खावू नये, असा टोला पवारांना लगावला.