Breaking News

पटनामध्ये गंगा नदीत नाव उलटली, 21 जणांचा मृत्यू

पटना, दि. 15 - बिहारची राजधानी पटनामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. गंगा नदीत नाव उलटून 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता आहेत. पतंग उत्सव आटोपून परतत असताना ही दुर्घटना घडली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे.
नावेमध्ये ओव्हरलोड झाल्याने ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. एका नावेत जवळपास 50 ते 60 जण होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. नावेमध्ये जास्त लहान मुलांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे.
एसडीआरएफच्या टीमकडून बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरु आहे. संक्रांतीच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाकडून पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी अनेकांनी उपस्थिती लावली. मात्र उत्सवावरुन परतताना ही दुर्घटना घडली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.