Breaking News

इस्तंबुलमध्ये 2 भारतीयांसह 39 जणांचे प्राण घेणारा अटकेत

इस्तंबुल, दि. 17 - नववर्षाचं स्वागत सुरु असताना 39 निरपराध नागरिकांचे प्राण घेणार्‍या इस्तानबुलमधील क्रुरकर्म्याला अखेर पकडण्यात आलं आहे. तुर्कीतल्या प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात वृत्त दिलं आहे. इस्तंबुलच्या इसेन्युअर्ट या जिल्ह्यात पोलिसांनी सोमवारी ही कारवाई केली. आयसिस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. उत्तर सीरियामध्ये तुर्की सैन्यानं केलेल्या कारवाईचा बदला म्हणून हा हल्ला केल्याचं आयसिसनं म्हटलं आहे.
नववर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी इस्तंबुलच्या रेना नाईटक्लबमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सांताक्लॉजच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यानं  अंधाधुंद गोळीबार केला. यात 39 नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात दोन भारतीयांचाही समावेश आहे. मुंबईच्या राजकीय आणि सिनेवर्तुळात प्रसिद्ध असलेले  आणि माजी राज्यसभा खासदार अख्तर हसन रिझवी यांचा मुलगा अबिस रिझवी यांचा इस्तंबूलमधील हल्ल्यात मृत्यू झाला. तर गुजरातमधील खुशी शाह ही फॅशन  डिझायनरही हल्ल्याचं सावज ठरली.